महाविकास आघाडीच्या भिंतीला सकाळी मतभेदांच्या “भेगा” पडल्या… दुपारी अनेक नेत्यांनी त्यात “लांबी” भरली आणि सायंकाळी मतभेदांच्या “भेगांवर” सगळे काही आलबेल असल्याची “रंगसफेदी” करण्यात आली…!! आजच्या दिवसभरातल्या घडामोडीचे हे सायंकाळी 6:30 वाजेपर्यंतचे सार आहे…!!MVA leaders tried to cover up the cracks in Thackeray – Pawar government
केंद्रीय तपास संस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर भडिमार सुरू असताना महाराष्ट्रातले गृहमंत्रालय त्यांना थंडा प्रतिसाद देते, अशा तक्रारी सकाळी शिवसेनेकडून वाढल्याच्या बातम्या आल्या… संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषदेत बॅटिंग करत जर महाराष्ट्राचे गृह मंत्रालय असेच शांत राहिले तर दररोज आपल्यासाठी ते खड्डे खणत राहिलेत असे समजा. आपल्या विरुद्ध आपल्या भोवती फास आवळत चालला आहे, असा इशारा दिला होता…
ठाकरे – वळसे भेट
दुपार होता होता गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचणे दोन्ही नेत्यांची काहीवेळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला. आपले सर्व सहकारी उत्तम काम करत आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असल्याचे त्यात सांगण्यात आले. एक प्रकारे आघाडीच्या मतभेदांच्या भिंतींमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यातून “लांबी” भरली… सायंकाळ होता होता आघाडीच्या मतभेदांच्या भिंतीवर “रंगसफेदी” देखील करण्यात आली…!!
“रंगसफेदी” पूर्ण
…आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार का ?,असा सवाल पत्रकारांनी संजय राऊत यांना केला. त्यावर संजय राऊत यांनी मी संपूर्ण राज्याच्या राजकारणात असताना मला तुम्ही फक्त गृह मंत्रालयात का अडकवून ठेवता?, असा मिश्किल सवाल करत ही “रंगसफेदी” पूर्ण केली.
सर्व काही आलबेल
एकूण सकाळी जे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या अतिवरिष्ठ नेतृत्वामध्ये मतभेदाचे चित्र रंगवले गेले ते सायंकाळपर्यंत मनोमिलनात रूपांतरित झाले होते… आणि अखेरीस सर्व काही आलबेल आहे असे सांगून आघाडीच्या मतभेदांच्या भिंतीच्या “भेगा” रंगसफेदीने झाकून टाकण्याला आल्या…!!
आमदारांची नाराजी मिटली का??
आता… शिवसेनेच्या 25 नाराज आमदारांचे काय झाले…?? त्यांचा निधीचा प्रश्न मिटला का…?? काँग्रेसच्या 25 नाराज आमदारांची नाराजी दूर झाली का…?? काँग्रेसला हवी असलेली महामंडळे मिळाली का…?? आमदारांच्या निधीचा प्रश्न सुटला का…??, असले प्रश्न दिवसभराच्या पत्रकार परिषदांमध्ये कोणाला विचारले नाहीत. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे कोणी दिली नाहीत.
तो “विषयच” नाही ना…!!
पण मूळात आमदारांची नाराजी… हा महाविकास आघाडीच्या भिंतीला पडलेल्या “मतभेदांच्या भेगांचा” विषयच नव्हता ना…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App