राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडलेले “अदानी मिसाईल” शरद पवारांनी ऐन मोक्यावर INDI आघाडीवरच उलटवले, असे म्हणण्याची वेळ शरद पवारांच्या कुठल्या वक्तव्याने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच आली आहे.INDI alliance leaders are in fix over adani issue rather than PM Modi!!
2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन राहुल गांधींनी फार मोठी राजकीय खेळी करून गेल्या दीड वर्षांपासून “अदानी मिसाईल” मोदींवर सोडले होते. अदानी हा विषय मोदींसाठी “बोफोर्स” ठरू शकण्याइतपत त्यात राहुल गांधींनी गांभीर्य आणले होते, पण राहुल गांधींची एकूण राजकीय समज आणि तयारी एवढी कमी पडली की त्यांना मोदी हे मिसाईल वेगवेगळ्या मार्गाने आपल्यावर उलटवू शकतात याचा अंदाज आला नाही. “अदानी मिसाईल” मोदींपर्यंत पोहोचण्याआधीच ते राहुल गांधींच्या काँग्रेसच्या जवळच्याच नेत्यांमार्फत INDI आघाडीवर उलटले आणि त्यातही शरद पवारांची भूमिका जास्त निर्णय ठरली!!
राजस्थान आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये आधीच्या काँग्रेस सरकारांनी अदानींबरोबर वेगवेगळे करार करून ठेवले होते. त्यामुळे त्या वेळचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल यांच्याशी अदानींचे असलेले संबंध या विषयावरून राहुल गांधींच्या अदानी विरोधातील भूमिकेविषयी ठळक प्रश्नचिन्ह लागलेच होते, पण त्यातही पवारांच्या अदानी विषयक भूमिकेने INDI आघाडीत पाचर मारून ठेवली.
मोदी आणि अदानी यांच्यातल्या आपापसातल्या संबंधांबद्दल राहुल गांधींनी जेवढे म्हणून आरोप केले होते, ते सगळे मोदी आणि अदानी या दोघांनीही एकही शब्द न उच्चारता जसेच्या तसे काँग्रेस सरकारांवर उलटवले. इतकेच नाही, तर उद्धव ठाकरेंची साथ मिळून सुद्धा काँग्रेसला “अदानी मिसाईलचा” मोदींविरोधात फारसा प्रभावी उपयोग करताना नाही. काल गौतम अदानींनी ज्यावेळी सिल्वर ओक वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली त्याचवेळी ही बाब अधोरेखित झाली.
अदानी – पवार भेटी मागे धारावी विकासाचा मुद्दा असल्याचे बोलले जाते. याच धारावी विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मोठा मोर्चा काढला होता आणि काँग्रेसची त्यामागे फरफट झाली होती. पण या मोर्चात शरद पवार गट फिरकलाही नव्हता. उलट बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानच्या एका इंजिनिअरिंग उपक्रमासाठी पवारांनी आधारित कडून 25 कोटींचे देणगी घेतले आणि त्याचा आवर्जून त्या कार्यक्रमात उल्लेख केला. या कार्यक्रमानंतर गौतम अदानी शरद पवारांना सिल्वर ओक वर येऊन भेटले. ही सगळी राजकीय मशक्कत INDI आघाडीवरच उलटल्याची चिन्हे आहेत.
राहुल गांधी आणि काँग्रेस दररोज काही ना काही तरी मोदी + अदानी या विषयावर सोशल मीडियावर बोलत राहतात, पण त्यावर मोदी किंवा अदानी चकार शब्दही काढत नाहीत. त्या उलट पवार अदानींकडून देणगी घेतात. त्यांना भेटतात. त्यांच्याशी धारावी विकास सारख्या मुद्द्यावर चर्चा करतात आणि त्यावेळेस सुप्रिया सुळे उपस्थित राहतात. या सगळ्यांमुळे राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याच समोर खरे ठळक प्रश्नचिन्ह उभे राहते.
मोदी – अदानी संबंधाबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांच्या मुद्द्यावर माध्यमे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारू शकत नाहीत. मोदी आणि अदानी यांच्या संबंधाविषयीची चर्चा माध्यमांमधून विरून जाते आणि त्याऐवजी ती चर्चा राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावून जाते. कारण एकीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि INDI आघाडीतले महत्त्वाचे नेते शरद पवार अदानींबरोबर वेगवेगळी “डील” करतात आणि त्याच वेळी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे अदानींचा संबंध मोदींशी जोडतात, ही बाब परस्पर विसंगत ठरते!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App