विशेष प्रतिनिधी
पुणे : “रामायण हे केवळ प्रभू श्रीरामचंद्रांचे एकट्याचे चरित्र नसून राम – जानकीचे संयुक्त चरित्र आहे. सीतेच्या उल्लेखाशिवाय रामाचे चरित्र कधीही पूर्ण होऊ शकत नाही. आजही व्यावहारिक आणि सामाजिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या दोघांचे चरित्र आपल्याला मार्गदर्शक ठरते. म्हणूनच, रामायण केवळ श्रद्धेच्या दृष्टिकोनातून न वाचता डोळसपणे वाचले पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले. The Untold Story of Sita
एमआयटी विश्वशांती विद्यापीठात अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या ‘न सांगितलेली सीतेची कथा’या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर भारतीय विचार साधनेचे कार्यवाह काशिनाथ देवधर, एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि ज्येष्ठ व्याख्याते संजय उपाध्ये उपस्थित होते.
“विदेशी संस्कारांत वाढलेल्या एका महिलेने सीतेच्या चरित्रावर पुस्तक लिहिणे, ही त्यांची आध्यात्मिक साधनाच असल्याचे मत भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने देशाचे आणि समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी थेट समाजात मिसळले पाहिजे, हाच आदर्श आपल्याला रामायणातून दिसतो. मानवाने आपल्या मर्यादा पाळल्या नाहीत, तर विनाश अटळ आहे. सीतेने ओलांडलेली लक्ष्मणरेषा आपल्याला याच मर्यादांचे भान शिकवते. प्रभू श्रीरामांनी वानरांच्या, म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या रूपात संघटित समाजाच्या शक्तीचे दर्शन घडवले, याचेच प्रतीक ‘रामसेतू’ आहे.
संजय उपाध्ये म्हणाले, प्रभू श्रीराम हे शत्रूविषयीही मनात कटुता न ठेवणारे थोर व्यक्तिमत्त्व आहे. आजच्या काळात जाणीवपूर्वक भारतीय मनांमध्ये रामाविषयी अनास्था निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सीतेची भूमिका ही मुळासारखी जमिनीखाली खोलवर रूजलेली आहे, तिचे सार आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे.
कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी पुस्तकातील पर्यावरण संवर्धनाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला, तर काशिनाथ देवधर यांनी, “समाज एकसंघ आणि समरस ठेवण्यासाठीच विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय विचार साधना करत आहे,” असे सांगितले. मिलिंद पात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
– भैय्याजी जोशी म्हणाले :
– आज आपल्याला केवळ माहितीने समृद्ध करणारे शिक्षण नको, तर विचार करण्यास प्रवृत्त करणारी शिक्षण पद्धती हवी आहे.
– रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात जमिनीवर आणण्याचे ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
– आज जगात दुष्ट शक्तींच्या हातात असलेले शस्त्र हे केवळ विनाशाचे द्योतक ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App