नाशिक : राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी धडपडाट; म्हणून तर फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याचा घालताहेत “घाट”!!, हेच राजकीय वास्तव राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यातून समोर आले.
– दत्तामामांचे पुतना मावशीचे फडणवीस प्रेम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. त्या पाठोपाठ वीज बिले देखील माफ केली. त्यामुळे भाजपच्या किसान मोर्चाने देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. त्या कार्यक्रमाला कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांना बोलाविले. त्या समारंभात भाषण करताना दत्तात्रय भरणे यांनी योग्यवेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे, यासाठी आपण विठ्ठलाला साकडे घालू, असे वक्तव्य केले. दत्तात्रय भरणे यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्याने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची स्तुती केली आणि त्यांना थेट पंतप्रधान करण्याची बात केली. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये त्याची बातमी झाली.
– राजकीय सत्य
पण त्यानंतर आज दत्तात्रय भरणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नेतृत्व करण्यासाठी का पाठवायचे??, याचा अप्रत्यक्ष खुलासा केला. त्यांच्या तोंडून राजकीय सत्य बाहेर आले. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते तर सुनेत्रा पवारांना का नाही मिळणार??, किंबहुना मिळाली पाहिजे, असे दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते म्हणाले. यात अमोल मिटकरी यांचा समावेश राहिला. पण या नेत्यांच्या वक्तव्याचा अर्थच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सोडावा आणि दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे म्हणजे महाराष्ट्रात राज्य करायला राष्ट्रवादीचे नेते “मोकळे” होतील, असा निघाला.
– पोस्टर वरचे मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत अनेक नेते आहेत. त्यांच्या समर्थकांनी या सगळ्या नेत्यांना पोस्टर वरच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर अनेकदा बसविले. त्यामध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार या पवारांच्या घराण्यातल्या तिघांचा नेहमीच समावेश राहिला. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्या नावावर देखील मुख्यमंत्री पदाच्या इच्छेचा शिक्का बसला, पण अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर त्या यादीत सुनेत्रा पवारांचा समावेश झाला. पण यापैकी कुणीही स्वकर्तृत्वावर कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शरद पवार देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या कुणालाही मुख्यमंत्रीपदावर बसवू शकले नाहीत. शरद पवारांना अगदी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाभोवती सुद्धा राष्ट्रवादीची एकजूट राखता आली नाही, तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनातली मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधी विरली नाही. ती वारंवार कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बाहेर यायची ती आलीच!!
– ना दिल्लीचे पाठबळ, ना स्वकर्तृत्व
पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला दिल्लीचे पाठबळ लागते किंवा स्वकर्तृत्व लागते, हे राजकीय सत्य मात्र राष्ट्रवादीचे नेते कायम विसरले. त्यामुळेच दत्तात्रय भरणे यांनी परस्पर “उद्योग” करून देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत नेतृत्व करायला पाठविले. त्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्रीपदासाठी “वशिला” लावून ठेवला, पण आज चंद्रकांतदादा पाटलांनी दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याला छेद दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतल्या नेतृत्वाचा विषय काढून तुम्ही विठ्ठलाला अडचणीत आणू नका, असा टोला चंद्रकांतदादा पाटील यांनी दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना हाणला. कारण त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खरा इरादा बरोबर ओळखला!! राष्ट्रवादीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बिलकुल रस नाही. त्यांना ते दिल्लीत गेले काय किंवा घरी गेले काय, यातही बिलकुल रस नाही. त्यांना फक्त राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचा आहे, हे राजकीय सत्य चंद्रकांतदादांनी बरोबर ओळखले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App