विशेष प्रतिनिधी
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस सुरू असतानाच राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर-रत्नागिरी महामार्गावर कामती येथे मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचा ताफा अडवल्याची घटना घडली. Padalkar
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी पडळकर यांच्याकडे केली. यानंतर पडळकर यांनी आंदोलकांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
पडळकर नेमकं काय म्हणाले?
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर भूमिका मांडताना गोपिचंद पडळकर यांनी मराठा समाजाच्या SEBC आणि कुणबी आरक्षणाला आपला कायम पाठिंबा असल्याचे सांगितले. मात्र, कुणबी दाखल्यांमध्ये खाडाखोड किंवा फेरफार केलेला आढळल्यास असे दाखले रद्दच केले जातील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
पडळकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आंदोलकांनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निवळल्याचे पाहायला मिळाले.
जरांगेंच्या उपोषणाचा आठवा दिवस
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान लाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी पाणी घेतले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांकडूनही विविध ठिकाणी सरकार आणि राजकीय नेत्यांकडे आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App