नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात १९८७ सालच्या डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणूकीच्या आठवणी जागविल्या. त्यावेळी त्यांनी एक ऐतिहासिकदृष्ट्या अर्धसत्य विधान केले, ते म्हणजे “हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते होते. आणि त्यासाठी त्यांना मतदानाचा हक्क गमावून किंमत चुकवावी लागली होती.”, हे ते विधान होय. या विधानातली दुसरे वाक्य खरे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली म्हणून कोर्टाने काढून घेतला होताच. तरीही बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर माघार घेतली नव्हती, हे देखील सत्यच आहे. Elections on Hindutva agenda; CM Uddhav Thackeray talked half truth
पण म्हणून बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकणारे देशातले पहिले नेते आहेत, हे विधान मात्र ऐतिहासिकदृष्ट्या खरे नाही. किंबहुना सत्याच्या कसोटीवर ते टिकणारे नाही.
भारतातल्या निवडणूकांचा थोडा इतिहास तपासला तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आधीच्या निवडणूका लढविल्या गेल्या आणि जिंकल्याही गेल्यात हे लक्षात येईल. आधीचे हिंदू महासभेचे नेते आणि नंतरचे जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अखंड बंगालच्या असेंब्लीची आणि नंतर लोकसभेची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकलेली आहे. मध्य प्रांताचे मुख्यमंत्री डॉ. ना. भा. खेर यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस सोडली होती. आणि लोकसभेवर १९५२ साली ते हिंदुमहासभेचे उमेदवार म्हणून ग्वाल्हेरमधून निवडून गेले होते. हा इतिहास नाकारता येणार नाही.
हिंदूमहासा आणि जनसंघाच्या हिंदुत्वाच्या शेड्स वेगवेगळ्या ठरल्या असतील, पण त्यांनी कधीही हिंदुत्वाचा राजकीय मुद्दा सोडल्याचा इतिहासाचा दाखला नाही. १९५२ निवडणूकीत हिंदूमहासभेचे ४ खासदार, जनसंघाचे ३ खासदार रामराज्य परिषदेचे ३ खासदार निवडून आले होते. देशात या तीनही हिंदुत्ववादी पक्षांना मिळून मते होती, ६.९५ टक्के. त्यामुळे या तीनही पक्षांना राष्ट्रीय पक्षाची मान्यता होती.
१९५७ च्या निवडणूकीत जनसंघाचे ४ खासदार तर हिंदूमहासभेचा १ खासदार निवडून आले होते, तर १९६२ च्या निवडणूकीत जनसंघाचे १४ खासदार, तर हिंदूमहासभेचा १ खासदार निवडून आले होते. १९६७ च्या निवडणूकीत जनसंघाचे ३५ खासदार निवडून आले होते, १९७१ च्या निवडणूकीत ही संख्या २२ वर आली होती. पण या दोन्ही निव़डणूकांमध्ये मतांची टक्केवारी १० टक्क्यांच्या आसपास होती.
ही सगळी आकडेवारी सांगण्याचे कारण वर उल्लेख केलेल्या राजकीय पक्षांची निवडणूकीतली अधिकृत भूमिका राजकीय हिंदुत्वाचीच होती. आणि आकडेवारीवर नीट नजर टाकली तर राजकीय हिंदुत्वाचा पाठिंबा दर निवडणूकीत वाढलेला दिसलाय.
१९७७, १९८० च्या निवडणूकीत जनसंघाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला. १९८५ च्या निवडणूकीत तर गांधीवादी समाजवाद नावाचा नवाच अवतार स्वीकारला. पण त्याला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते हा देखील इतिहास ताजा आहे.
त्यानंतर मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे – भाजप नेते प्रमोद महाजनांच्या मैत्रीतून महाराष्ट्रात शिवसेना – भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आणि १९८७ नंतरचा पुढचा इतिहास घडलाय… उध्दव ठाकरेंनी तो सांगितलाय. पण त्या आधीचा इतिहास त्यांनी सांगितला नाही. त्यातून हिंदुत्ववादी पक्षांच्या इतिहासाबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतात म्हणून ही वास्तव इतिहासाची उजळणी…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App