वृत्तसंस्था
पॅरिस : PM Modi फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाचा आढावा घेतला. या काळात भारताने आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचा दावा करत त्यांनी देशातील विविध क्षेत्रांतील बदलांची आकडेवारी मांडली.PM Modi
मोदी म्हणाले की, गेली १२ वर्षे ही १४० कोटी भारतीयांच्या सामर्थ्याची आणि आत्मविश्वासाची वर्षे ठरली आहेत. या कालावधीत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट झाली असून देशातील विमानतळांची संख्या आणि विद्यापीठांची संख्याही दुप्पट झाली आहे. महामार्ग उभारणीचा वेग तिपटीने वाढला, तर मेट्रो रेल्वेचे जाळे चारपटीने विस्तारले आहे.PM Modi
भारताच्या उत्पादन आणि निर्यात क्षेत्रातही मोठी वाढ झाल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, गेल्या १२ वर्षांत देशाची निर्यात तिपटीने वाढली आहे. मोबाईल उत्पादन क्षेत्रात शंभरपट वाढ झाली असून भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे.
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे सांगताना मोदी यांनी ही प्रगती केवळ आर्थिक नसून सामाजिक परिवर्तनाचीही कथा असल्याचे नमूद केले. त्यांच्या मते, गेल्या १२ वर्षांत देशातील २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्यात भारताला यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला.
निवास सुविधांबाबत बोलताना मोदी म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत भारतात गरजूंसाठी जितकी पक्की घरे बांधली गेली, ती संख्या संपूर्ण फ्रान्समधील घरांच्या संख्येपेक्षाही अधिक आहे. तसेच देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे काम करण्यात आले असून आर्थिक समावेशन ही मोठी सामाजिक चळवळ ठरली आहे.
या विकासाच्या प्रवासातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे भारतीयांचा वाढलेला आत्मविश्वास असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. आजचा भारत मोठी स्वप्ने पाहत आहे. देशातील युवक, शेतकरी, महिला आणि उद्योजक नव्या संधींचा लाभ घेत पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भारतातील बदलांकडे लक्ष वेधताना मोदी म्हणाले की, ज्या गावांपर्यंत पूर्वी मूलभूत सुविधा पोहोचवणे अवघड होते, त्या गावांमध्ये आता वीज, इंटरनेट आणि विविध डिजिटल सेवा उपलब्ध झाल्या आहेत. मोबाईल तंत्रज्ञानामुळे नागरिकांना बँकिंगसह अनेक सेवा एका क्लिकवर मिळत आहेत.
शेतकरी, मच्छीमार, दुग्धव्यवसायिक, महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी तंत्रज्ञान नव्या संधी निर्माण करत असल्याचे सांगताना त्यांनी डिजिटल क्रांतीचा विशेष उल्लेख केला. देशात १५० कोटींपेक्षा अधिक आधार ओळखपत्रे जारी करण्यात आली असून सुमारे ९० कोटी नागरिकांच्या डिजिटल आरोग्य ओळखपत्रांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय नोंदी सुरक्षित आणि सहज उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात भारताने जगासमोर आदर्श निर्माण केला असल्याचा दावा करत मोदी म्हणाले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयमुळे दर महिन्याला अब्जावधी डिजिटल व्यवहार होत आहेत. लहान दुकानदारांपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत सर्वांनी डिजिटल व्यवहारांचा स्वीकार केला आहे.
भारताचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मॉडेल आता जगातील अनेक देश अभ्यासत असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान हे केवळ सुविधा देणारे साधन नसून सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंधांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील सहकार्य विश्वास, नवोन्मेष आणि सामायिक प्रगतीवर आधारित आहे. संरक्षण, अवकाश, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता या क्षेत्रांमध्ये भविष्यात सहकार्याच्या आणखी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
भारत आणि फ्रान्स मिळून केवळ आपल्या देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी नवे उपाय आणि नव्या संधी निर्माण करतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App