नाशिक : मनोज जरांगे आले आणि रोहित पवारांनाच टोले हाणून गेले!!, असे राजकीय चित्र आज पंढरपुरात दिसले. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनात मराठा आंदोलन मनोज जरांगे आले आणि त्यांनी भाषण करून रोहित पवारांची पुरती गोची करून ठेवली. मनोज जरांगे यांनी शरद पवार आणि नरेंद्र मोदी संबंधांवरून रोहित पवारांना जाहीर टोले हाणले. रोहित पवारांनी ज्या हेतूने मनोज जरांगे यांना आंदोलन स्थळी बोलविले होते. त्यावर मनोज जरांगे यांच्या भाषणे पुरते पाणी फेरले.
रोहित पवारांनी पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी सलग तीन दिवस अन्नत्याग आंदोलन केले. पण या दरम्यान त्यांनी पाणी प्यायले. रोहित पवारांची शुगर कमी झाल्याची बातमी काल आली, पण आज ते आंदोलन स्थळी एकदम तरतरीत दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आणि बॉडी लँग्वेज मध्ये कुठेही उपोषणाची थकावट दिसली नाही.
आपल्या अन्नत्याग आंदोलनाला ग्लॅमर मिळावे म्हणून रोहित पवारांनी सगळे कुटुंबीय आंदोलन स्थळी बोलविले. त्याचबरोबर मनोज जरांगे यांना सुद्धा निमंत्रण दिले. रोहित पवारांच्या निमंत्रणानुसार मनोज जरांगे अन्नत्याग आंदोलनाच्या स्थळावर आले. पण रोहित पवारांना अपेक्षित असणारे आक्रमक भाषण करण्याऐवजी मनोज जरांगे यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांनाच टोले हाणले. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या भाषणाच्या वेळी रोहित पवारांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
मनोज जरांगे म्हणाले :
तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी भूमिका घेतली म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमच्या राजकारणाशी माझा काही संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचे काम केले. जे जी आर निघत नव्हते, ते त्यांनी काढले म्हणून आम्ही सरकारच्या बाजूने चांगले बोलतो. त्यामुळे लोक आता मला देवेंद्र फडणवीस यांचा माणूस म्हणतात. पण मी इथून गेलो तिथे मला पुन्हा पवारांचा माणूस म्हणायला लागतील.
तुम्ही अन्नत्याग उपोषण करताय. पण खरं म्हणजे तुम्हाला उपोषण करायची गरजच पडता कामा नये कारण नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध फार मैत्रीचे आहेत. नरेंद्र मोदी शरद पवारांना पाणी पाजतात. त्यामुळे तुम्ही शरद पवारांनाच मोदींना फोन लावायला सांगा आणि तुमचे काम करून घ्या.
तुम्ही उगाच उपोषणाच्या फंदात पडू नका. उपोषण फार अवघड असते हे मी अनुभवाने सांगतो. उपोषणामुळे आपल्या शरीराची फार हानी होते. पोटात प्रचंड आग होते. सगळी हाडे दुखतात. डॉक्टरांना सुद्धा आपली प्रकृती शोधायचे समजत नाही. तुमच्या बाबतीत कदाचित कसे होणार नाही कारण तुम्ही मोठी माणसे आहात. तुमच्याकडे सगळं उपलब्ध आहे. आमच्याकडे काही नाही पण तरीही सांगतो. उपोषण फार अवघड आहे. ते तुम्ही सोडून द्या. एकदा शरीराची हानी झाली, तर ती पुन्हा भरून निघणार नाही, हे लक्षात ठेवा.
तुम्ही कितीही शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली, तरी तुम्ही राजकीय पक्षात काम करताय, त्यामुळे लोक त्याला राजकारणच म्हणणार. यात लोकांची चूक नाही. पण तुम्हाला आणि तुमच्या सारख्या नेत्यांना चार-पाच पक्षांची मोठी व्यासपीठे उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही प्रश्न सोडवून घेऊ शकता. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुणी विचारत नाही त्यामुळे आम्हाला उपोषण आंदोलन करावे लागते. आम्हाला सत्ताधारी पक्ष विचारत नाही आणि तुमचा विरोधी पक्ष सुद्धा विचारत नाही.
उपोषणाच्या आंदोलनात माझी पीएचडी झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही हे उपोषण आंदोलन बंद करा. ते तुम्हाला झेपणार नाही. डॉक्टर कुठे आणि कशा सुया टोचतात, आणि त्याचा किती त्रास होतो हे माझं मला माहिती आहे. मला डॉक्टरांनी मोठ मोठ्या सुया टोचल्या. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसाठी वेगळ्या सुया असतील कदाचित. पण त्या टोचल्यावर सुद्धा त्रासच होतो. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा.
तुम्ही उपोषण थांबवा. एकदा सरकारवर विश्वास ठेवा. आम्ही सुद्धा सरकारवर विश्वास ठेवला. कारण त्यांनी मराठ्यांसाठी काही चांगले निर्णय घेतले. दत्तात्रेय भरणे आणि गिरीश महाजन म्हणतात तर त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी काही काम केले नाही, तर मग नंतर मोठे आंदोलन करा. तेव्हा सुद्धा आम्ही तुमची साथ देऊ. पण फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिला तर साथ देऊ.
डोक्यावर हात मारून घ्यायची आली वेळ
मनोज जरांगे यांनी असे काही भाषण केले, की त्यामुळे रोहित पवारांची पुरती राजकीय गोची झाली. मनोज जरांगे यांनी जोरदार भाषण करावे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात मोठे वातावरण पेटवावे. त्यामुळे आपल्याला त्याचा राजकीय लाभ घेता येईल, अशी रोहित पवारांचे अपेक्षा होती. पण मनोज जरांगे यांनी रोहित पवारांच्या अपेक्षेनुसार भाषण केले नाही. त्यामुळे रोहित पवारांना अप्रत्यक्षपणे डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली.
काँग्रेस – राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुद्धा पाणी
पण मनोज जरांगे यांनी रोहित पवारांना पाठिंबा देण्याऐवजी किंवा त्यांची अपेक्षा पूर्ण करणे ऐवजी त्यांनाच उपोषण आंदोलन सोडून द्यायचा सल्ला दिला. पण त्या पलीकडे जाऊन पवार आणि मोदी यांच्या संबंधांवर नेमकेपणाने बोट ठेवून सगळ्या पवार कुटुंबाची राजकीयदृष्ट्या गोची केली. एकीकडे सगळे पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी धडपडत असताना मनोज जरांगे यांनी पवार आणि मोदी यांच्या संबंधांची जाहीर आठवण करून दिल्याने पवार कुटुंबीयांच्या राजकीय प्रयत्नांवर सुद्धा पाणी फेरले गेले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App