विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Ambadas Danve वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या घटनेत संबंधित पोलिस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.Ambadas Danve
दानवे यांनी पत्रात म्हटले आहे की, सुरेश बोरसे यांचा मृत्यू हा केवळ एक अपघाती प्रकार नसून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. पोलिस आणि त्यांच्यासोबत असलेल्या कथित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून झालेल्या मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप असून, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.Ambadas Danve
वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस… pic.twitter.com/68tmxSDz5U — Ambadas Danve (@iambadasdanve) June 12, 2026
वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस… pic.twitter.com/68tmxSDz5U
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 12, 2026
‘मारहाणीनंतर जबरदस्तीने वाहनात बसवल्याचा आरोप’
दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे की, वैजापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी नागरगोजे आणि त्यांचे सहकारी हे एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी रवी आवारे व इतरांसोबत वेरूळ येथे तपासासाठी आले होते. त्यावेळी सुरेश बोरसे यांनी केवळ चौकशीच्या उद्देशाने काही प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीने वाहनात बसवून नेण्यात आले, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनाही धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित झाले प्रश्न
या संपूर्ण प्रकरणात अनेक संशयास्पद बाबी असल्याचे दानवे यांनी नमूद केले आहे. तपासासाठी आलेले अधिकारी गणवेशाऐवजी खासगी कपड्यांमध्ये का होते? शासकीय वाहनाऐवजी आरोपींच्या विनाक्रमांक वाहनाचा वापर का करण्यात आला? सुरेश बोरसे यांना वाहनात का बसवण्यात आले? त्यांच्यावर मारहाण का झाली? तसेच कुटुंबीयांशी गैरवर्तन का करण्यात आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीतून समोर यायला हवीत, असे त्यांनी म्हटले आहे.
गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला?
दानवे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करताना म्हटले आहे की, घटना 10 जून रोजी रात्री घडल्याचा आरोप असताना गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला, याचीही चौकशी झाली पाहिजे. खुलताबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पुरेसा नसल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करून अधिक गंभीर कलमे लावण्याची आवश्यकता असल्याचा दावा त्यांनी केला.
‘आरोपींचा जामीन रद्द करा’
या प्रकरणातील काही आरोपींना अल्पावधीत जामीन मिळाल्याने तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित आरोपींचा जामीन रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील’
सुरेश बोरसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करताना दानवे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा किंवा प्रकरण दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App