वृत्तसंस्था
इम्फाळ : Manipur Violence मणिपूरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जातीय संघर्षाला पुन्हा एकदा हिंसक वळण मिळाले आहे. गुरुवारी पहाटे कामजोंग जिल्ह्यातील कुलतूह कुकी गावावर संशयित सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला चढवत कुकी समाजातील दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी गावातील सुमारे 30 घरांनाही आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.Manipur Violence
या घटनेच्या अवघ्या एका दिवसापूर्वी कांगपोकपी जिल्ह्यातून नागा समाजातील सहा जणांचे मृतदेह सापडल्याने राज्यातील परिस्थिती आधीच तणावपूर्ण बनली होती. सलग दोन गंभीर घटनांमुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Manipur Violence
पहाटेच्या हल्ल्याने गाव हादरले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 4.55 वाजता कुलतूह कुकी गावात सशस्त्र हल्लेखोर घुसले. त्यांनी अंधाधुंद गोळीबार करत दोन नागरिकांची हत्या केली. त्यानंतर अनेक घरांना आग लावण्यात आली. आगीत किमान 30 घरे जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने परिसरात धाव घेतली असून अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. हल्ल्यामागे नेमके कोण आहे, याचा तपास सुरू आहे.
29 दिवसांनंतर सापडले 6 नागा नागरिकांचे मृतदेह
दरम्यान, बुधवारी कांगपोकपी जिल्ह्यातील कराम वैफेई गावातून सहा मृतदेह सापडले होते. हे मृतदेह 13 मे रोजी लिलोन वैफेई गावातून अपहरण करण्यात आलेल्या सहा नागा नागरिकांचे असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
जवळपास 29 दिवसांपासून हे नागरिक बेपत्ता होते. मृतदेह सापडल्यानंतर ते पोरोम्पाट येथील रुग्णालयात आणण्यात आले. ही माहिती मिळताच शेकडो नागरिक रुग्णालयाबाहेर जमले आणि वातावरण तणावपूर्ण झाले.
रुग्णालयाबाहेर तणाव, पोलिसांना अश्रुधूराचा वापर
मृतदेह रुग्णालयात पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संतप्त नागरिकांनी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) तसेच इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या पथकांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
नागा संघटनांचा संताप; अनेक ठिकाणी आंदोलन
सहा नागा नागरिकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ विविध भागांत आंदोलन करण्यात आले. सेनापती जिल्ह्यातील करोंग भागात आंदोलकांनी मालवाहू ट्रक जाळल्याची घटना घडली. काही ठिकाणी तोडफोडही करण्यात आली.
तमेंगलोंग जिल्ह्यातील तामेई परिसरातही नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. नागा संघटनांनी या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
8 जूनलाही नागा गावावर हल्ला
यापूर्वी 8 जून रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील पोंग्रिंगलॅंग रोंगमेई नागा गावातही गोळीबाराची घटना घडली होती. नागा समाजाच्या मते, कुकी उग्रवादी संघटनांनी हा हल्ला केला होता.
या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या चुन्जांग्लुंग पान्मेई या नागा व्हिलेज गार्डचा मृतदेह जंगलात आढळला होता. त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. या घटनेनंतर नागा संघटनांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले होते.
तीन वर्षांत 731 विस्थापितांचा मृत्यू
मणिपूरमधील जातीय संघर्षाचा मानवी परिणामही अत्यंत गंभीर आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत हिंसाचार आणि विस्थापनामुळे 731 लोकांचा मृत्यू झाला आहे.
चुराचांदपूर जिल्हा – 248 मृत्यू बिष्णुपूर जिल्हा – 151 मृत्यू कांगपोकपी जिल्हा – 128 मृत्यू
सध्या राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये 43 हजार 676 हून अधिक नागरिक अद्यापही विस्थापित अवस्थेत राहत आहेत.
पुन्हा पेटण्याची भीती
नागा आणि कुकी समाजाशी संबंधित सलग दोन गंभीर घटनांमुळे मणिपूरमधील परिस्थिती आणखी संवेदनशील बनली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्या तरी या घटनांमुळे नव्या हिंसाचाराची शक्यता वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नव्या रक्तपाताने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App