विशेष प्रतिनिधी
धाराशिव : अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक यांचा प्रचार “शांतपणे” करायचा निर्णय घेतला, पण त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा धडाका उडवला. अर्थात एकनाथ शिंदे यांनी कुठलीही राजकीय टीकाटिप्पणी न करता प्रचार चालवला. Eknath Shinde
जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल मैदान येथे आज शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेला संबोधित करताना धाराशिवच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल तर महायुतीला साथ द्या, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी महात्मा बसवेश्वरांना वंदन केले, तर दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यात शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये दिले जात असल्याचे नमूद करत पीकविमा, अतिवृष्टी नुकसानभरपाई आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याचे निर्णय घेतल्याचेही याप्रसंगी स्पष्ट केले. कर्जमाफीसाठी समिती गठित केली असून याबाबत योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
महिला भगिनींना एसटी तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगत महिला भगिनींचा प्रवास सुलभ झाल्याचे अधोरेखित केले. मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा उल्लेख करतानाच एका इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलीच्या आत्महत्येनंतर सरकारने १०० टक्के फी माफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याची आठवण याप्रसंगी करून दिली.
उमरगा पंचायत समितीची नवी इमारत, लोहरा व उमरगा तालुक्यांसाठी एमआयडीसी व मेडिसिटी, निम्न तेरणा प्रकल्पावर पर्यटन केंद्र, ग्रामीण रस्त्यांसाठी २६ कोटी रुपयांचा निधी, १९ ग्रामपंचायत इमारतींसाठी तरतूद, पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे ८० कोटी रुपये, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी ६० कोटी रुपये तसेच दलित वस्ती सुधारणा, जनसुविधा, वैयक्तिक शौचालये, औषधी सुविधा आणि संत सेवालाल महाराज योजनेसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले.
येत्या सात तारखेला महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून जिल्हापरिषद व पंचायत समितीवर पाठवा असे आवाहन यावेळी केले. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. बंडखोर, बोगस उमेदवारांना मत देऊ नका असेही यावेळी निक्षून सांगितले.
याप्रसंगी परिवहन मंत्री तथा धारशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भगवान देवकाते तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App