विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.Raj Thackeray
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये मागील काही महिन्यांत चार ते पाच वेळा भेट झाली. त्यामुळे आगामी निवडणुकांत मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच राज-उद्धव ठाकरेंची युती ही ‘दिल-दिमाग से बनी हुई’ असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांच्या दाव्यामुळे ठाकरे बंधुंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.Raj Thackeray
नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत. जिल्हा आणि ब्लॉक पातळीवरील अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतले जातील. त्यामुळे नवीन मित्रपक्ष घेण्याची आवश्यकता नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच विद्यमान महाविकास आघाडी पुरेशी मजबूत आहे. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही, असे सपकाळ म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचा मनसेविरोध स्पष्ट झाला असून, ठाकरे बंधुंची युती झाल्यास महाविकास आघाडीचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही कुठे युतीसाठी तुमच्याकडे आलोय – मनसे
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाला मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “युतीसाठी आम्ही कुणाकडे गेलो नाही. आमच्याकडे आले असतील, तर त्यांना विचारावे. आमच्या पक्षात निर्णय घेण्याचे अधिकार फक्त राज ठाकरे यांनाच आहे,” असे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले. तसेच “सध्या माध्यमांत विविध चर्चा सुरू आहेत, काही भेटीगाठी कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत, राजकीय नाहीत. राज ठाकरे जे आदेश देतील त्यानुसार आम्ही महाराष्ट्रसैनिक काम करू. बाकी पक्षांना शुभेच्छा.” असेही अविनाथ अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.
सपकाळांच्या विधानावर ठाकरे गटाचे स्पष्टीकरण
दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील मतभेद समोर झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी सांगितले की, “मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरांमध्ये मनसेसोबत युतीबाबत आमचा सकारात्मक प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पातळीवर चर्चा होईल, कुठे युती शक्य होईल आणि कुठे नाही हे त्यावर ठरेल.”
अहिर पुढे म्हणाले, “काँग्रेस स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे. तो पक्ष महाविकास आघाडीचा भाग असला तरी त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण हर्षवर्धन सपकाळ यांचे म्हणणे बारकाईने ऐकले तर लक्षात येईल की, त्यांनी युतीच्या निर्णयाबाबत स्थानिक स्तरावर चर्चा होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे ठाणे आणि पुण्यासारख्या काही भागांमध्ये काँग्रेस वेगळी भूमिका घेऊ शकते, पण अंतिम निर्णय चर्चेनंतरच होईल.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App