विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uday Samant : “नालायकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली, तर शहराची वाट लागेल,” असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. त्यांचा रोख शिंदे गटाच्या शिवसेनेवर होता. या टीकेला आता शिंदे गटाच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील मतभेद नवीन नाहीत. शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी नाईक सोडत नाहीत. जरी भाजप आणि शिंदे गट महायुतीचा भाग असले, तरी स्थानिक समीकरणांमुळे त्यांच्यात खटके उडतात. एका कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक म्हणाले, “तुम्ही भविष्याचा विचार करणार आहात की नाही? काही ठिकाणी पाणी साचते, पण शहराची तुंबापुरी होत नाही. नवीन एफएसआय लागू झाला, तर शहराची वाट लागेल. नालायकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता गेली, तर शहराचे वाटोळे होईल.” नाईक यांची ही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिव्हारी लागल्याचे दिसते.
शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी नाईक यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “तुम्ही म्हणता नालायकांच्या हातात सत्ता दिली, तर शहराचे वाटोळे होईल. म्हणूनच लोक तुम्हाला सत्ता देणार नाहीत. अशी भाषा बोलणे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? आमचे खासदारही अशी वक्तव्ये करू शकतात, पण एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षांबद्दल असे बोलू नये, अशी शिकवण दिली आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. पण शिंदे यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही.”
शिंदे गटाने मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि शिवसेनेचाच महापौर बसेल, असे सांगितले जात होते. शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणात शिंदे यांचा सूर काहीसा मवाळ झाल्याचे दिसले. त्यांनी, “मुंबईवर महायुतीचा महापौर बसेल,” असे वक्तव्य केले. यावरून शिंदे यांना निवडणुकीत भाजपची गरज भासत असल्याचे स्पष्ट होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App