विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Bridge जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.Pune Bridge
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.
कुंडमळा येथे एकूण 50 जणांना नदीपात्रातून बाहेर काढून विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय 15 ते 20 जणांना किरकोळ दुखापत होऊन ते परस्पर घरी निघून गेले आहे.
जितेंद्र डुडी पुढे म्हणाले की, यातील अधिकांश लोक हे रुग्णालयात असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी एकजण गंभीर जखमी आहे. तर या दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे डुडी म्हणालेत.
दहा दिवसांपूर्वीच पर्यटकांनी अशा सेन्सिटिव्ह ठिकाणी जाऊ नये असे आदेश काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुलांचाही समावेश आहे. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस आणि पुणे झोन 2 च्या डीसीपींनी 2 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 6 जणांना वाचवण्यात आले आहे.
नदीचा जोरदार प्रवाह पाहण्यासाठी अनेक लोक उभे असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्घटनेत 2 लोकांचा मृत्यू- CM देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले, पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा पूल आधीच खूपच वाईट आणि जीर्ण अवस्थेत होता. अपघाताच्या वेळी पुलावर क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक होते. लोक दुचाकी आणि मोटारसायकली घेऊन जात होते. त्यामुळे पुलाला भार सहन होत नव्हता.
कुंडमळा हे पुण्यापासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. मुंबईकडे जाताना, एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी हे ठिकाण लागते. या ठिकाणी कुंडमळा धबधबा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. मोठ्या संख्येने येथे पर्यटक येत असतात.
मोरबी पूल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला होता
यापूर्वी, 30 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील मोरबी येथे एक झुलता पूल कोसळला होता. या अपघातात 135 जणांचा मृत्यू झाला होता.
पुलाची क्षमता सुमारे 100 लोकांची होती, परंतु रविवार सुट्टीचा दिवस असल्याने त्यावर सुमारे 500 लोक जमले होते. यामुळेच हा अपघात झाला. पूल कोसळल्याने लोक जिथे पडले तिथे 15 फूट पाणी होते. काही लोक पोहत बाहेर पडले. पण बाकीचे वाचू शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App