विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Dr. G. Madhavi Lata पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चेनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूलाचं उद्घाटन नुकतंच झालं. या पुलामुळे ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ असा देशाचा अखंड लोहमार्ग अखेर पूर्णत्वास पोहोचला आहे. या ऐतिहासिक क्षणाच्या केंद्रस्थानी होत्या भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) भू-तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका – प्रा. डॉ. जी. माधवी लता. त्यांनी या कठीण प्रकल्पाच्या मूलभूत पाया बांधणीचं नेतृत्व केलं.Dr. G. Madhavi Lata
चिनाब नदीपासून तब्बल ३५८ मीटर उंच असलेला हा पूल, आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. त्याची लांबी १,३१५ मीटर असून, तो कटरा आणि काझीगुंड दरम्यान उभा आहे. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे मार्गाचा भाग आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹१,४८६ कोटी असून त्याचे आयुष्य सुमारे १२० वर्षं गृहीत धरले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं अभियांत्रिकी आव्हान असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पण या भव्य प्रकल्पामागे यंत्रणांइतकंच मोलाचं योगदान होतं ते डॉ. माधवी लता यांचं. त्या खडक, माती आणि जमिनीच्या अभ्यासात तज्ज्ञ आहेत. उत्तर रेल्वे आणि अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने त्यांना सल्लागार म्हणून नेमलं. त्यांनी या प्रकल्पासाठी हिमालयाच्या उतारांवर, भूकंपसदृश भागात, २६० किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यांमध्ये स्थिर आणि सुरक्षित पाया घडवण्यासाठी काम केलं.
या ठिकाणी काम करताना अनेक अडथळे होते. खडकांचं विभागलेलं स्वरूप, लपलेल्या गुहा, बदलते भूगर्भीय घटक, आणि पाण्याचा नियंत्रण. पारंपरिक डिझाइन इथे चालणार नव्हते. म्हणूनच त्यांनी ‘Design as You Go’ ही लवचिक कार्यपद्धती स्वीकारली. म्हणजे, प्रत्यक्ष बांधकामाच्या वेळीच जमिनीच्या स्वरूपानुसार डिझाइनमध्ये बदल करत गेले.
त्यांच्या नेतृत्वाखाली उतारांची स्थिरता तपासली गेली, हजारो मीटर लांबीचे rock anchors खडकांत खोलवर बसवले गेले, आणि सिमेंट ग्राऊटिंग करून पूल घट्ट रूतवला गेला. विशेष म्हणजे जवळपास ५०० मीटर लांबीचा भाग कोणत्याही आधाराशिवाय हवेत उभा आहे, आणि तरीही तो स्थिर आहे — यामागे आहे डॉ. लता यांचं अचूक संशोधन.
त्यांचा शैक्षणिक प्रवासही आदर्शवत आहे. १९९२ मध्ये JNTU मधून B.Tech, नंतर NIT Warangal मधून सुवर्णपदकासह M.Tech, आणि IIT मद्रासमधून २००० मध्ये PhD पूर्ण केल्यानंतर त्यांनी IIT गुवाहाटीमध्ये अध्यापन केलं. २००४ पासून त्या IISc मध्ये कार्यरत असून आज त्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजी सेंटरच्या प्रमुख आहेत.
IISc मध्ये रुजू झाल्यानंतर त्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील पहिल्या महिला प्राध्यापिका ठरल्या. सुरुवातीला विभागात महिलांसाठी स्वतंत्र शौचालयही नव्हतं. त्यासाठी त्यांनी लढा दिला. आज त्या विभागात महिलांचं प्रमाण वाढलं असून, त्या महिला विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत खास सहाय्यकही उपलब्ध करून देतात. त्या म्हणतात, “मी स्वतः स्त्री आहे, त्यामुळे त्यांना काय अडचणी येतात, हे समजून घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर IISc ने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे लिहिलं – “आम्हाला प्रा. माधवी लता आणि त्यांच्या टीमचा अभिमान आहे. त्यांनी उतार स्थिरता, पाया डिझाइन आणि रॉक अँकर्सच्या माध्यमातून चेनाब पूल सुरक्षितपणे उभारण्यासाठी मोलाचं योगदान दिलं.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App