‘’कायम घरी बसलेल्यांना ‘शासन आपल्या दारी’चे महत्व कळणार कसे..?’’ असा टोलाही लगावला.
विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने काल कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेचा ठाण्याचा गड अभेद्य ठेवण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवाय, उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. Chief Minister Eknath Shinde targets Uddhav Thackeray for criticizing Deputy Chief Minister Devendra Fadnavis
‘’ठाणे हे वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेबांचा विचारांनी चालणारे शहर आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करूनच आपण आजवर हा किल्ला अभेद्य ठेवला असून यापुढेही तो अभेद्यघ राहील.’’ असे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘त्यांच्याच आशीर्वादाने सर्वसामान्य ठाणेकर शिवसैनिक आज मुख्यमंत्रीपदावर बसला असून, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपण सारे कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’ राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले असून अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील विकासाच्या मुद्यावर आपल्यासोबत सत्तेत सामील झाली आहे. आपल्या सरकारने आजवर घेतलेले प्रत्येक निर्णय सर्वसामान्य माणसाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी घेतला असून त्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे.’’ असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच ‘’माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो, जेव्हा सत्ता नसेल तेव्हाही लोकांनी आपल्याशी सन्मानाने वागायला हवे असे वर्तन आपण ठेवावे.’’ अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
याचबरोबर ‘’ज्या मतदारांच्या मतावर आपण निवडून आलो त्यांना दगा देऊन गद्दारी कुणी केली ते आपण जाणतो, मात्र आम्ही कधीही पातळी सोडून टीका केली नाही आणि करणार नाही.’’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ‘’आज गावोगावी फिरतो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला सांगतो, की आम्ही केलं ते चूक नाही तर बरोबरच आहे. देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हणता, पण त्याच देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ साली मुंबई महापालिकेत भाजपा सहज महापौर बसवू शकत असतानाही तुमच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेतली सत्ता सोडली. त्यांना तुम्ही काय वागणूक दिलीत..? तसेच, ‘शासन आपल्या दारी’वर टीका करता पण लोकांनी हे अभियान डोक्यावर घेतले असून लाखो लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. कायम घरी बसलेल्यांना ‘शासन आपल्या दारी’चे महत्व कळणार कसे..? आम्ही लोकांसाठी शिलाई मशीन घेतो, नोटा मोजायचे मशीन घेत नाही असे सांगतानाच, आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही.’’ असं म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
याशिवाय ‘’याआधीच्या अडीच वर्षात लोकहिताचे अनेक प्रकल्प फक्त वैयक्तिक इगोपायी रखडवले, मेट्रोच्या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली, लोकांचे पैसे विनाकारण वाया गेले. राज्यकर्त्यांने वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून लोकहिताला प्राधान्य द्यायचे असते, पण स्वतःच्या अहंकारापुढे ते देखील करणे जमले नाही. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये अनेक लोकं स्वतःहून सहभागी होत आहेत. हा प्रवाह कमी होत नाही उलट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. “ये कारवा बढता ही जायेगा, रोक सको तो रोक लो” असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिले.
तर, ‘’राज्यातील सरकार स्थिर असून आता २०० आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ४५ हुन अधिक आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले असून त्यासाठी साऱ्यांनी सज्ज व्हावे.’’ असे आवाहन शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App