वृत्तसंस्था
चेन्नई : TN Govt तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून ओढाताण सुरू आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी गुरुवारी पुन्हा टीव्हीके प्रमुख विजय यांचा सरकार स्थापनेचा दावा फेटाळला. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ११८ आमदारांच्या सह्या घेऊनच परत येण्यास सांगितले. एक दिवस आधीही विजय यांनी सरकार स्थापनेच्या दाव्यासाठी ११२ आमदारांच्या पाठिंब्यासह राज्यपालांची भेट घेतली होती.TN Govt
विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या. विजय दोन जागांवरून विजयी झाल्याने टीव्हीकेकडे १०७ आमदार आहेत. ५ आमदारांच्या काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला हा आकडा ११२ होतो. २३४ जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागा हव्यात. राज्यपालांनी विजय यांना आश्वासन दिले आहे की ते इतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणार नाहीत.TN Govt
यादरम्यान, टीव्हीकेने संख्याबळ जमवण्यासाठी डावे पक्ष, व्हीसीके आणि आययूएमएल यांच्या मनधरणीचे प्रयत्न वाढवले आहेत. हे पक्ष पुढील दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. सीपीआय-एमचे राज्य सचिव पी. षण्मुगम म्हणाले, पक्ष ८ मे रोजी पाठिंब्यासाठी टीव्हीकेच्या विनंतीवर विचार करेल. सीपीआयचे सचिव वीरपांडियन म्हणाले, शुक्रवारी निर्णय होऊ शकतो. व्हीसीकेचे नेते थोल तिरुमावलवन म्हणाले, डाव्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरच निर्णय होईल.
केरळ; चेंडू काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात
केरळला मुख्यमंत्री निवडीसाठी निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सर्व ६३ आमदारांशी वैयक्तिक चर्चा केली. आता मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांडकडे सोपवला आहे. व्ही. डी. सतीशन, रमेश चेन्नीथला व के. सी. वेणुगोपाल यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.
आसाम; १२ ला शपथविधी, मोदी सहभागी होणार
आसाममध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा १२ मे रोजी गुवाहाटीच्या खानापारा येथे होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जे. पी. नड्डा व नायबसिंह सैनी ९ मे रोजी गुवाहाटीत पोहोचतील, जिथे १० मे रोजी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील मुख्यमंत्र्यांची निवड होईल. भाजपप्रणीत एनडीएने १०२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले.
अण्णाद्रमुकने आपले २८ आमदार पुद्दुचेरीच्या रिसॉर्टमध्ये हलवले
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींदरम्यान अण्णाद्रमुकचे २८ आमदार पुद्दुचेरीच्या रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहेत. हे आमदार ज्येष्ठ नेते सी. व्ही. षण्मुगम यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. बहुमतासाठी टीव्हीके प्रमुख विजय यांना आणखी ६ आमदारांची गरज आहे, तर राज्यपालांनी त्यांच्याकडे समर्थक आमदारांची यादी आणि स्वाक्षरी केलेले पुरावे मागितले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीके आणि अण्णाद्रमुकच्या बंडखोर गटात उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा सुरू आहे, मात्र सरचिटणीस एडाप्पादी पलानीस्वामी याच्या विरोधात आहेत. या राजकीय कोंडीत काही नेते टीव्हीकेला कायदेशीर पर्याय आजमावण्याचा किंवा पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App