विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन आशियाई महासत्तांच्या संबंधांमध्ये मोठी घडामोड घडली आहे. दिल्लीतील ‘ब्रिक्स शिखर परिषद 2026’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. तब्बल सात वर्षांनंतर जिनपिंग भारत दौऱ्यावर आले असताना झालेल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, बैठकीत भारत-चीन संबंधांशी संबंधित तब्बल सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारत मंडपम येथे झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. दोन्ही देशांमधील मागील काही वर्षांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सीमावाद, व्यापार, आर्थिक संबंध आणि जागतिक पातळीवरील सहकार्य अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
नेमक्या कोणत्या 7 मुद्द्यांवर झाली सहमती?
1. संबंधांकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहणार
भारत आणि चीनने द्विपक्षीय संबंधांकडे रणनीतिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्यावर भर दिला आहे. दोन्ही देशांमधील संबंध केवळ एखाद्या तात्कालिक मुद्द्यावर आधारित न राहता व्यापक पातळीवर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
2. मतभेदांचे रूपांतर वादात होऊ न देण्यावर भर
भारत आणि चीनमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र या मतभेदांचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊ नये, यासाठी संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर दोन्ही बाजूंनी भर दिला आहे.
3. सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
सीमा प्रश्न हा भारत-चीन संबंधांमधील सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. या प्रश्नावर निष्पक्ष, न्याय्य आणि दोन्ही देशांना स्वीकारार्ह असा तोडगा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यावर सहमती झाल्याचे सांगण्यात आले आहे.
4. व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना चालना
दोन्ही देशांमधील आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलण्यावरही चर्चा झाली. व्यापार वाढवतानाच दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
5. नागरिकांमधील संपर्क वाढवणार
भारत आणि चीनमधील लोकांमधील परस्पर संपर्क वाढवण्यावरही भर देण्यात आला. यामुळे पर्यटन, शिक्षण, संस्कृती आणि इतर क्षेत्रांतील देवाणघेवाण वाढण्याची शक्यता आहे.
6. व्यापार तुटवड्याच्या प्रश्नावर काम
भारताचा चीनसोबत मोठा व्यापार तुटवडा आहे. चीनकडून होणारी मोठ्या प्रमाणावरील आयात आणि त्या तुलनेत भारतीय उत्पादनांना चीनच्या बाजारपेठेत मर्यादित संधी हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या आर्थिक चिंतांवर दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याचे मान्य केले आहे.
7. जागतिक आव्हानांवर सहकार्य
प्रादेशिक तसेच जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत आणि चीनमधील सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. बदलत्या जागतिक समीकरणाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
LAC वर मोदींचा स्पष्ट संदेश
बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तविक नियंत्रण रेषेवर म्हणजेच LAC वर शांतता आणि स्थिरता राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सीमा भागात शांतता आणि स्थैर्य असल्याशिवाय भारत-चीन संबंध पूर्णपणे सामान्य होऊ शकत नाहीत, असा भारताचा स्पष्ट दृष्टिकोन राहिला आहे.
त्यामुळे सात वर्षांनंतर झालेल्या मोदी-जिनपिंग भेटीत सीमावाद हा चर्चेचा केंद्रबिंदू राहिल्याचे मानले जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी सीमा भागातील परिस्थिती स्थिर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावरही महत्त्वाची घडामोड
ब्रिक्स शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका मांडण्यात आली असून, दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा रोखणे आणि संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे.
या भूमिकेमुळे भारतासाठी दहशतवादाच्या मुद्द्यावर ब्रिक्स व्यासपीठाचे महत्त्व आणखी वाढले आहे. चीननेही या भूमिकेला सहमती दर्शवल्याने भारत-चीन संबंधांच्या संदर्भात ही बाब विशेष चर्चेत आली आहे.
संबंध सुधारण्याच्या मार्गात अजूनही दोन मोठे अडथळे
मोदी-जिनपिंग भेटीनंतर भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने सकारात्मक संकेत मिळाले असले तरी आव्हाने संपलेली नाहीत. सीमावाद आणि व्यापार तुटवडा हे दोन प्रमुख प्रश्न अजूनही कायम आहेत.
LAC वर दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य निर्माण करणे हे दोन्ही देशांसमोरील मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर भारताचा चीनसोबतचा मोठा व्यापार तुटवडा कमी करणे आणि भारतीय उत्पादनांना चीनच्या बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळवून देणे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे.
सात वर्षांनंतरची भेट, पण पुढे काय?
मोदी आणि जिनपिंग यांची सात वर्षांनंतर झालेली ही भेट केवळ औपचारिक कूटनीतिक बैठक नसून, भारत-चीन संबंधांच्या पुढील दिशेचे संकेत देणारी ठरू शकते. दोन्ही देशांनी संवाद कायम ठेवण्याबरोबरच मतभेद नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे.
‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या जुन्या भावनिक राजकारणापेक्षा व्यावहारिक सहकार्य, आर्थिक हितसंबंध आणि नियंत्रित स्पर्धा या आधारावर भारत-चीन संबंधांचा नवा अध्याय सुरू होणार का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सात वर्षांनंतर झालेल्या या महाबैठकीनंतर दोन्ही देश प्रत्यक्षात किती पुढे जातात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App