विनायक ढेरे
नाशिक – “ओढून ताणून आणा, पटोले नाना”…!!; अशी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था झाली आहे. नाना पटोले यांचे लोणावळ्यात भाषण होऊन पाच दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महाभारताच्या गोष्टीही सांगून झाल्या आहेत. shiv sena`s saamna editorial targets Nana Patole again
पण तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नाना पटोलेंचा हाती बटेरासारखा लागलेला विषय सोडायला तयार नाहीत. नानांच्या त्या तथाकथित वादग्रस्त भाषणावरून शिवसेना आणि काँग्रेसचे नेते त्यांना आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाला ठोक ठोक ठोकून घेत आहेत. नानांच्या भाषणातला, “मुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवतात” आणि “खंजीर खुपसण्याचे राजकारण” हे दोन विषय शिवसेना आणि राष्ट्रवादीला एवढे झोंबलेत की त्यांनी आता नाना पटोलेंना कायमचा धडा शिकविण्यासाठी त्या भाषणाचा वापर करून घ्यायचे ठरवलेले दिसते.
नानांविरोधात अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून घेतली. शरद पवारांनी नानांना छोटा माणूस म्हणून घेतले. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंतांनी त्यांना खासगीत बोला, चव्हाट्यावर बोलू नका, असे सुनावून झाले. नाना पटोले अति मोठे नेते आहेत, असा टोला संजय राऊतांनी हाणून घेतला. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, मंत्रीव्दय अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे सिल्वर ओकवर जाऊन आलेत. तरीही नाना नावाच्या छोट्या माणसाचा विषय संपायला तयार नाही. म्हणूनच की काय आजच्या सामनातूनही शेलक्या शब्दांमध्ये नानांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत.
शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे,” असे सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे. अर्थात हा टोला नानांना आहे, की पवारांना हे सामनाकारच सांगू शकतील.
त्यात जर दिल्लीश्वरांना अशी खबर लागलीच असेल की, महाराष्ट्रात नाना नामक विभूतीकडे काँग्रेसला संजीवनी देण्याचा मंत्र किंवा गुटिका प्राप्त झाली असून त्यामुळे काँग्रेस स्वबळावर सत्तेवर येऊ शकते, तर त्यांचे कान नक्कीच टवकारले गेले असतील. काँग्रेसच्या नानांना प्राप्त झालेला हा मंत्र किंवा विद्या काय आहे ते ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी नानांवर पाळत ठेवण्याचा प्रयोग केंद्राकडून सुरू आहे असेच दिसते, फोन टॅपिंगवरून असा टोला केंद्रालाही लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी देऊन राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचा हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे आणि त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियांका गांधींना दिली आहे काय? देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे. त्या प्रत्येक राज्यात नानांना द्रोणागिरी पर्वत उचलून त्यातली संजीवनी गुटिका द्यावीच लागेल. लक्ष्मण मुर्छीत झाला तेव्हा हनुमानाने हेच केले होते, पण येथे नक्की कोण मुर्छीत झाले आहे आणि हनुमानाच्या भूमिकेत कोण आहे? ते पाहायला हवे,” असा शब्दांत सामनाने काँग्रेसचा उपहास केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App