मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईकडे निघण्याची तयारी करणाऱ्या मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत थांबण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याने आता आपण मोजक्याच लोकांसह मुंबईला जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.
विशेष प्रतिनिधी
आंतरवाली सराटी : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली. मुंबईला जाण्यासाठी समाजाकडून सुरू असलेली तयारी सध्या थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र, आपण स्वतः मुंबईला जाणार असून, यावेळी केवळ एक-दोन गाड्या आणि मोजकेच लोक सोबत असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मी एकटाच मुंबईला जातो, मग तरी परवानगी देतील ना?’
जरांगे पाटील म्हणाले, “आपल्याला मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. मात्र, मी दोन गाड्या घेऊन मुंबईला निघणार आहे. मी एकटाच आंदोलन करतो, मग तरी परवानगी देतील ना?”
आपण दिलेला शब्द मागे घेणार नसून, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, यासाठी आपण पुढाकार घेऊन मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
‘मराठ्यांनी माझ्यासोबत येऊ नये’
यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचे आवाहन केले. “मुंबईला जाताना माझ्यासोबत केवळ दोन गाड्या असतील. दहा माणसांपेक्षा जास्त कोणीही माझ्यासोबत येऊ नये. मराठ्यांनी माझ्यासोबत येऊ नका,” असे त्यांनी सांगितले.
“मराठ्यांच्या वाटेतील काटे मला काढू द्या, मला खिंड लढू द्या. त्यानंतर तुम्हाला कोणत्या दिवशी यायचे, ते मी सांगतो,” असेही जरांगे पाटील म्हणाले.
वर्गणी आणि गाड्या तयारच ठेवा
मराठा समाजाने मुंबई आंदोलनासाठी केलेली आर्थिक आणि वाहनांची तयारी वाया जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वर्गणी काढली असेल किंवा गाड्या तयार ठेवल्या असतील, तर त्या सध्या तशाच ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
“वर्गणी आणि गाड्यांना हात लावू नका. त्या योग्य कामासाठी उपयोगात येणार आहेत. आता तुम्हाला तयारीसाठी आणखी वेळ मिळाला आहे. ज्यांनी दोन गाड्या तयार ठेवल्या असतील, त्यांनी तीन गाड्या तयार ठेवा,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
फडणवीसांवरही गंभीर आरोप
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. सणासुदीच्या काळाचा आधार घेत मराठा समाजातील तरुणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबईतील आंदोलनाची दिशा आता बदलली असली तरी आपण आपला शब्द मागे घेणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App