विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर भागांतून कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत टोलमाफी देण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ खासगी वाहनांसोबतच एसटी महामंडळाच्या कोकणाकडे जाणाऱ्या बसनाही मिळणार आहे. Ganesha devotees
दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील विविध शहरांमधून कोकणात आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांचा आर्थिक भार कमी करण्यासोबतच त्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या उद्देशाने सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या मार्गांवर मिळणार टोलमाफी?
सरकारच्या निर्णयानुसार मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच कोकणाकडे जाणाऱ्या अन्य संबंधित मार्गांवरील टोलनाक्यांवर ही सवलत लागू असेल. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे मुंबई आणि ठाण्याहून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनचालकांसह पुणे आणि राज्यातील इतर भागांतून जाणाऱ्या गणेशभक्तांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
टोलमाफीसाठी विशेष पास आवश्यक
टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनचालकांना ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा उल्लेख असलेला विशेष पास किंवा स्टिकर घ्यावा लागणार आहे. हा पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव यांसारखी माहिती नमूद केली जाणार आहे.
वाहनाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पात्र भाविकांना पास दिला जाणार आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित पास घेणे आणि तो वाहनावर स्पष्टपणे लावणे महत्त्वाचे आहे.
परतीच्या प्रवासालाही टोलमाफी
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या भाविकांना आणखी एक दिलासा देण्यात आला आहे. विशेष पास केवळ कोकणाकडे जाण्यासाठीच नव्हे, तर परतीच्या प्रवासासाठीही वैध राहणार आहे. त्यामुळे गावी जाऊन गणेशोत्सव साजरा केल्यानंतर मुंबई, पुणे किंवा अन्य शहरांकडे परतताना पुन्हा स्वतंत्र पास घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
एसटी बसनाही टोलमाफी
ही टोलसवलत केवळ खासगी वाहनांपुरती मर्यादित नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कोकणाकडे जाणाऱ्या बसनाही या टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त एसटी सेवा चालवल्या जात असल्याने या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीलाही दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता प्रशासनाने विविध उपाययोजनाही सुरू केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर काही कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत, तर काही भागांत पर्यायी मार्ग आणि वाहतूक व्यवस्थापनाची तयारी करण्यात आली आहे.
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात
यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे. या काळात मोठ्या संख्येने नागरिक कोकणातील आपल्या गावी जाणार असल्याने महामार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयामुळे गणेशभक्तांचा प्रवासाचा खर्च काही प्रमाणात कमी होणार असून, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही गणेशोत्सवाची मोठी गुड न्यूज ठरली आहे. मात्र, टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेला विशेष पास आधीच घेणे आणि प्रवासादरम्यान तो सोबत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App