विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. राज्य सरकार मराठा समाजाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही काहीही करा, आम्हाला मारून टाका; पण आरक्षणाच्या मागणीपासून आता एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. Manoj Jarange
आंतरवाली सराटी येथे १२ सप्टेंबर रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईकडे मोर्चाने जाण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जरांगे यांनी समाजाला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले.
“मराठा समाजातील आत्महत्यांमुळे या निर्दयी सरकारला काहीही फरक पडत नाही. उलट हा शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला बळी आहे,” असा आरोप त्यांनी केला. समाजाने हतबल न होता एकत्र यावे आणि सरकारला आपल्या मागण्यांसमोर झुकण्यास भाग पाडण्यासाठी लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महायुती सरकारने मराठा समाजाचे मोठे नुकसान केल्याचा आरोप करत जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला हे मान्य आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यामार्फत कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे रद्द करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या रस्त्यावर उतरून या निर्णयाला समर्थन देणारे काही लोकही सरकारनेच उभे केले असल्याचा दावा त्यांनी केला.
“सरकारची भीती आता स्पष्ट दिसत आहे. मात्र, अशा पद्धतीने जमवलेली ताकद जास्त काळ टिकत नाही,” असेही जरांगे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. “कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला तुमच्या जातीशी काही देणेघेणे उरले नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
“मी माझी भाषा बदलणार नाही. उलट ज्यांनी मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, त्यांच्याविरोधात माझी भाषा यापुढे आणखी तीव्र आणि कडक असेल,” असा इशारा जरांगे यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांनाच मराठ्यांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा राजकीय परिणाम शिवसेनेला भोगावा लागेल, असा दावाही त्यांनी केला. उद्योगमंत्री उदय सामंत संयम बाळगण्याचे आवाहन करत आहेत; मात्र मराठा समाजाचा संयम सुटला तर परिस्थिती काय असेल, असा सवाल करत जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App