विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. Sunetra Pawar
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पीएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून, सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विस्तार आहे. पुणे महानगर प्रदेशाचा वेगाने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
इनर रिंग रोडसह महत्त्वाच्या प्रकल्पांना गती
पुणे इनर रिंग रोड, कॉम्प्रेहेंसिव्ह मोबिलिटी प्लॅनअंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आवश्यक ती गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर आणि पीएमआरडीए क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध भागांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मल्टिमोडल हब, औद्योगिक कनेक्टिव्हिटी, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच विमानतळाशी जोडणी यांचा एकात्मिक विचार करून भविष्यातील वाहतूक नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माण-हिंजवडी मेट्रोला वेग देण्याचे निर्देश
माण-हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. या २३ स्थानकांच्या मेट्रो मार्गिकेतील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, आणखी ५ स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
उर्वरित कामांना गती देऊन हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
नद्यांच्या प्रदूषणावरही भर
पीएमआरडीए क्षेत्रातील इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, संबंधित यंत्रणा आणि संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व शाश्वत होणे आवश्यक आहे. भविष्यातील देखभाल-दुरुस्ती आणि संचालनाचा खर्चही सक्षमपणे भागवता येईल, अशा पद्धतीने प्रकल्पांचे नियोजन करावे, असे पवार यांनी सांगितले.
१२ नवीन अग्निशमन केंद्रे प्रस्तावित
पीएमआरडीए क्षेत्रातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता अग्निसुरक्षेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही बैठकीत चर्चा झाली. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम प्रगतीपथावर असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना गती देऊन नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
भविष्यातील पाणीप्रश्नासाठी आतापासून नियोजन
पीएमआरडीए क्षेत्रात वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच दीर्घकालीन नियोजनातून सोडवावा, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्याबरोबरच जलस्रोत, वितरण व्यवस्था आणि भविष्यातील गरजा यांचा एकत्रित विचार करून नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे, पर्यटनस्थळे आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते-इमारतींपलीकडे सर्वंकष विकास
पुणे महानगर प्रदेशाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा. त्यासाठी पीएमआरडीएच्या विविध विभागांनी समन्वयाने आणि वेगाने काम पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App