– महिला वारकऱ्यांसाठी खासगी स्वच्छतागृहे खुली करण्याचे आवाहन; शाळा, महाविद्यालयांनाही सहभागाची विनंती
विशेष प्रतिनिधी
पुणे : अतिवृष्टीमुळे आषाढी वारीतील अनेक वारकरी थेट पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, पुण्यात आलेल्या वारकऱ्यांची राहण्याची आणि विशेषतः स्वच्छतागृहांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्माचार्य गतिविधी आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीने ‘वारी मित्र घर’ अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील मध्यवर्ती पेठ भागातील नागरिकांनी, व्यापारी आस्थापनांनी आणि खासगी शाळांनी आपली स्वच्छतागृहे वारकऱ्यांसाठी खुली करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
धर्माचार्य गतिविधीचे सहसंयोजक ह. भ. प. मंगेश महाराज मोरे आणि रवी हिरवे यांनी माहिती दिली. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी ऐनवेळी पुण्यात अडकलेल्या दिंड्यांसाठी वडगावशेरी आणि कसबा भागात ऐनवेळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मोरे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे अडकलेल्या वारकऱ्यांसाठी गेली दोन दिवस तातडीची व्यवस्था करण्यात येत आहे. वारी पुण्यात असेपर्यंत ही सुविधा आणि अभियान सुरू राहणार आहे. वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वच्छता राखणे हे प्रत्येक पुणेकराचे सामाजिक कर्तव्य आहे. त्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.”
कसबा पेठेसह मध्यवर्ती भागात या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, अनेक वारकऱ्यांना सुरक्षित निवारा मिळवून दिला जात आहे. तसेच स्वयंसेवकांच्या माध्यमातून माहिती देणारे फ्लेक्स, पॅम्पलेट लावण्यात आले असून, शाळा आणि महापालिकेची स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मोरे म्हणाले, “शहरातील प्रत्येक कुटुंबाने किमान ५ महिला वारकऱ्यांसाठी आपल्या घरातील स्वच्छ शौचालय वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे आणि तशी कल्पना संबंधित दिंडी प्रमुखांना द्यावी. ज्या खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दिंड्यांचा मुक्काम नाही, त्यांनी ९ आणि १० जुलै रोजी आपल्या वास्तू मधील शौचालये वारकऱ्यांसाठी दिवस – रात्र खुली ठेवावीत. शहरातील दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि अन्य खासगी मालकीच्या इमारतींमधील शौचालयेही वारकऱ्यांच्या वापरासाठी खुली करण्यात यावीत. असे आवहन आम्ही केले आहे.”
अतिवृष्टीच्या या आपत्कालीन परिस्थितीत पुणेकरांनी नेहमीप्रमाणेच आपले औदार्य दाखवून वारकरी माउलींच्या सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन धर्माचार्य गतिविधी आणि अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App