विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar शाळा हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे आणि त्यांचे भविष्य घडवणारे पवित्र ठिकाण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील एका शाळेत घडलेल्या घटनेने या विश्वासालाच मोठा हादरा दिला आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या माजी वर्गशिक्षकावर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी फेल झाल्याचा राग मनात धरून या विद्यार्थ्याने आधी शिक्षकांसोबत तब्बल अर्धा तास वाद घातला आणि त्यानंतर संतापाच्या भरात हा रक्तरंजित हल्ला केला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.Chhatrapati Sambhaji Nagar
टीसी घेण्यासाठी आलेला एक अल्पवयीन विद्यार्थी थेट मुख्याध्यापिकांच्या दालनात गेला, जिथे त्याची भेट त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्याशी झाली. सुरुवातीला त्यांच्यात सामान्य चर्चा झाली, परंतु अल्पावधीतच या चर्चेचे रूपांतर तीव्र वादात झाले. मुख्याध्यापिका आणि शिक्षक या विद्यार्थ्याची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, मात्र सुमारे अर्धा तास चाललेल्या या वादानंतर परिस्थिती अचानक नियंत्रणाबाहेर गेली. विद्यार्थ्याच्या मनात गेल्या दोन वर्षांपासून साचलेला अपयशाचा संताप अखेर उफाळून आल्याने हा सगळा प्रकार घडला.Chhatrapati Sambhaji Nagar
शिक्षक धूशिंग बाहेर पडत असतानाच चाकूचा वार केला
2023 मध्ये नववीत शिकत असताना तो विद्यार्थी परीक्षेत नापास झाला होता आणि त्यावेळी त्याचे तत्कालीन वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्यासोबत त्याचे खटकेही उडाले होते. याच अपयशाचा राग मनात धरून, आज टीसी घेण्यासाठी येताना त्याने ऑनलाईन मागवलेला चाकू सोबत आणल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्याध्यापकांच्या दालनातील वाद संपून शिक्षक धूशिंग बाहेर पडत असतानाच, या विद्यार्थ्याने अचानक चाकू काढून त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी शिक्षकाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या एका व्यक्तीलाही त्याने चाकूचा धाक दाखवून मागे हटवले. तर या अत्यंत भयानक गोंधळात मुख्याध्यापिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचा बचाव झाला.
शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू
या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक सखोल तपास केला जात आहे.
दरम्यान, या एका दुर्दैवी घटनेमुळे समाज आणि शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात खदखदणारा राग आणि नैराश्य वेळेवर ओळखण्यात आपली व्यवस्था खरोखरच कमी पडत आहे का? तसेच, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून घातक शस्त्रे अल्पवयीन मुलांच्या हाती इतक्या सहज कशी पोहोचत आहेत, हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यामंदिरात जर शिक्षकच सुरक्षित नसतील, तर शिक्षण व्यवस्थेसमोर उभ्या राहिलेल्या या भयावह संकटावर आता संपूर्ण समाजानेच अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App