विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी त्याची जाणीव ठेवून जबाबदारीने काम करावे, असा स्पष्ट संदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला. नगरसेवकांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या अडचणी समजून घ्या, तसेच सर्वसाधारण सभेत शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि व्यापक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर भर द्या, अशा सूचना त्यांनी भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना केल्या.Murlidhar Moho
महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील कथित गटबाजी आणि नगरसेवकांमध्ये असलेली नाराजी गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये चर्चेत आहे. काही नगरसेवकांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रारी केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षांतर्गत समन्वय वाढविण्यासह महापालिकेच्या कामकाजाबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून एखादा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यासाठी आधीच तयारी करण्याची गरज आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. भाजपकडे अनुभवी, अभ्यासू आणि उच्चशिक्षित नगरसेवक आहेत. त्यामुळे विषयानुसार नगरसेवकांची टीम तयार करून विरोधकांच्या आरोपांना वस्तुस्थिती आणि योग्य माहितीच्या आधारे प्रभावी उत्तर द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
दरम्यान, बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ यांनी बैठकीत निधीवाटपावरून कोणताही वाद किंवा नाराजी झाल्याचे नाकारले. सर्वसाधारण सभेपूर्वी होणारी ही नियमित बैठक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यपत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाल्यानंतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरी प्रश्न मांडले. अधिकाऱ्यांबाबत काही नगरसेवकांच्या तक्रारी असल्या, तरी योग्य कामे प्रशासनाकडून करून घेण्यासाठी नगरसेवकांनी सातत्याने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर, सभागृह नेते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे मोहोळ यांनी सांगितले. नगरसेवक हे थेट नागरिकांच्या संपर्कात असल्याने त्यांच्या प्रभागातील समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतात. त्यामुळे प्रत्येक स्थानिक प्रश्न सर्वसाधारण सभेत मांडण्याऐवजी शहराच्या व्यापक हिताचे विषय जीबीमध्ये आणावेत आणि स्थानिक प्रश्न पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून सोडवावेत, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेत भाजपची सत्ता असून नगरसेवकांकडे पाच वर्षांचा कार्यकाळ आहे. त्यामुळे सर्व विकासकामे एकाच वेळी पूर्ण होणे शक्य नाही. उपलब्ध अर्थसंकल्पाचा योग्य वापर करून विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करता येतील, असे मोहोळ यांनी नमूद केले. केंद्र आणि राज्यातही भाजपची सत्ता असल्याने पुण्याच्या विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर, उपनगर आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये निधीवाटप करताना भेदभावाची भावना ठेवू नये. ‘जास्त निधी मिळाला तरच पुन्हा निवडून येऊ’, अशी मानसिकता न ठेवता पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही मोहोळ यांनी नगरसेवकांना केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App