विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress NSUI राज्यातील आणि देशातील शिक्षण व्यवस्थेत सातत्याने होणाऱ्या पेपरफुटी, मराठी शाळा बंद पडण्याची स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून काँग्रेसची विद्यार्थी आघाडी ‘एनएसयूआय’ (NSUI) आणि युवक काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या सर्व प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सात दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्या घरावर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि युवक काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा झीनत शबरीन यांनी दिला आहे.Congress NSUI
टिळक भवन, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने तयार केलेली शालेय शिक्षणमंत्र्यांची ‘मार्कशीट’ प्रकाशित करत सरकारचे वाभाडे काढले.Congress NSUI
दादा भुसेंची ‘मार्कशीट’ आणि राजीनाम्याची मागणी
एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि युवकांशी संवाद साधून शिक्षणमंत्री दादा भुसे यांची एक विशेष ‘मार्कशीट’ तयार केली आहे. या मार्कशीटच्या माध्यमातून त्यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन केले असून, त्यात पेपरफुटी, शालार्थ आयडी घोटाळा आणि शाळा बंदी यांसारख्या विषयांचा समावेश आहे. “ज्याप्रमाणे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागली, तशीच जबाबदारी स्वीकारून दादा भुसेंनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठी शाळा बंदचे धोरण आणि विद्यार्थ्यांचा ड्रॉप-आउट रेट
साळुंखे यांनी राज्य सरकारच्या मराठी शाळा बंद करण्याच्या धोरणावर कडाडून टीका केली. “राज्यात आतापर्यंत १,२०० पेक्षा जास्त मराठी शाळा बंद झाल्या आहेत आणि १७,५०० शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ पटसंख्येच्या नावाखाली गरिबांच्या आणि वंचितांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे हे षड्यंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी जपानचे उदाहरण दिले, जिथे एका विद्यार्थिनीसाठी तीन वर्षे रेल्वे स्टेशन चालू ठेवण्यात आले होते.
माध्यमिक शिक्षणात मुलींचा ‘ड्रॉप-आउट’ (शाळा गळती) रेट प्रचंड वाढला असून, २०१४-१५ मध्ये हे प्रमाण १०.३% होते. शौचालयांचा अभाव, शाळेपासूनचे अंतर आणि बालविवाह यांसारख्या कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा बोजा
राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा दावा त्यांनी केला. “संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमधील वर्ग ओस पडले आहेत, कारण बहुतांश शिक्षक बीएलओ (BLO) आणि इतर निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. मुंबईत 85 ते 90% शिक्षक ड्युटीवर आहेत. नुकतेच मुंबईत एका शिक्षकाचे तणावामुळे निधन झाले. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना हे काम बेरोजगार तरुणांना का दिले जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण विभागांतील गैरप्रकार
शिक्षण खात्यातील इतर मंत्र्यांवरही जोरदार आरोप करण्यात आले. “राज्यात बोगस नर्सिंग महाविद्यालयांचा सुळसुळाट झाला आहे. मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षणमंत्री न राहता बोगस नर्सिंग कॉलेज वाटणारे मंत्री झाले आहेत,” अशी खोचक टीका करण्यात आली. त्यांनी नंदुरबार येथील ‘एमकेडी’ (MKD) कॉलेजचे उदाहरण दिले, जिथे आदिवासी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App