विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunil Tatkare : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आज अर्ज दाखल केला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या राजकारणातील सक्रियतेचे स्वागत करताना, अजित पवार यांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले.Sunil Tatkare :
पार्थ पवारांचे सक्रिय होणे पक्षासाठी महत्त्वाचे
पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाल्याबद्दल बोलताना तटकरे म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ यांनी पक्षकार्यात अधिक सक्रिय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला, ही पक्षासाठी चांगली बाब आहे. संघटनेत काम करताना वेगवेगळी मते असू शकतात, मात्र त्यातूनच पक्षाची वाटचाल पुढे जात असते.Sunil Tatkare :
ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली. शरद पवार यांच्यासारखे देशाच्या राजकारणात अनेक दशकांचा प्रभाव असलेले नेतृत्व पक्षाला लाभले. पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याची परंपरा होती आणि अजित पवार यांनीही तीच कार्यपद्धती पुढे सुरू ठेवली.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर चर्चा झाली होती
प्राजक्त तनपुरे यांनी अलीकडेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्यासाठी बैठका झाल्याचा दावा केला होता. याबाबत विचारले असता तटकरे म्हणाले की, यात कोणताही मोठा गौप्यस्फोट नाही. ही वस्तुस्थितीच आहे.
अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाली होती. काही बैठकींना आपण उपस्थित नव्हतो, मात्र त्या बैठकींची माहिती अजित पवार स्वतः देत असत. त्यामुळे तनपुरे यांनी सांगितलेली बाब नवीन नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी जाहीर करण्यात उशीर का होतो?
महायुतीतील उमेदवारांची नावे अनेकदा अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात जाहीर होतात, याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असतील तर जागावाटपावर सविस्तर चर्चा करावी लागते.
प्रत्येक पक्षाची स्वतःची राजकीय गणिते आणि अपेक्षा असतात. सर्व मुद्द्यांवर तातडीने एकमत होईलच असे नाही. महायुतीत वरिष्ठ नेतृत्वाकडे विविध प्रश्न जात असतात आणि त्यावर सर्वांना समान न्याय मिळेल, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला काहीसा वेळ लागणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज
काँग्रेसवर टीका करताना तटकरे म्हणाले की, हातातोंडाशी आलेली संधी निसटल्याची भावना काँग्रेसमध्ये असू शकते. चंद्रपूर महापालिकेत बहुमत असूनही काँग्रेसला स्वतःचा महापौर निवडून आणता आला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसमध्ये नेमके काय सुरू आहे यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगतानाच त्यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीवर अप्रत्यक्ष टीका केली. काही नगरसेवक संपर्काबाहेर जात असतील, तर इतरांवर आरोप करण्याऐवजी संबंधित पक्षाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी लगावला.
विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला पाच महिने उलटून गेले असले तरी हा अपघात होता की घातपात, याबाबत अद्याप स्पष्ट निष्कर्ष समोर आलेला नाही. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, अशा प्रकारच्या विमान दुर्घटनांच्या तपासासाठी केंद्र स्तरावर निश्चित यंत्रणा कार्यरत असते.
राज्य सरकारने सुरुवातीला गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी जाहीर केली होती. त्यानंतर सर्वांच्या मागणीनुसार केंद्रीय अन्वेषण विभागाकडूनही तपास सुरू करण्यात आला. विमानातील माहिती नोंदवणारी यंत्रणा आणि इतर तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निष्कर्ष काढला जातो, असे त्यांनी सांगितले.
जनतेसमोर सत्य यायला हवे
तटकरे म्हणाले की, या प्रकरणाबाबत आमच्याही मनात काही शंका आहेत. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन स्वतंत्र तपासाची मागणी केली होती.
तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि त्यातील सर्व निष्कर्ष राज्य व देशातील जनतेसमोर मांडले जावेत, हीच आमची भूमिका असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App