विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya Sule राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही गंभीर आत्मचिंतन केले पाहिजे, असे त्या म्हणाल्यात.Supriya Sule
सुप्रिया सुळे यांनी काहीवेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्या म्हणाल्या, भोंदू अशोक खरात हा एकटा नाही. हे एक खूप मोठे रॅकेट आहे. एक भोंदूबाबा अजून काय-काय उद्योग करत होता हे देवालाच ठावूक. पण, केंद्र व राज्य सरकारने या प्रकरणी कोणतीही तडजोड न करता, कोणत्याही दबावाला न बळी पडता या प्रकरणी कठोर कारवाई करावी. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीत पारदर्शकता ठेवून त्यात सातत्य ठेवावे. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. प्रस्तुत प्रकरणात सत्तेतील अनेक लोकांचा समावेश आहे. पण या भोंदूबाबाच्या विरोधात पोलिस यंत्रणा व गृह मंत्रालय जे काही करत आहे ते स्वागतारार्ह आहे. चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे. पण महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.Supriya Sule
काही गोष्टी निवडकपणे टाळल्या जात आहेत
भोंदू खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणी त्यांच्या भगिणी प्रतिभा धानोरकर शिर्डी पोलिसांपुढे हजर झाल्या आहेत. पत्रकारांनी सुप्रिया सुळेंचे याकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, या प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. त्यामुळे कुणा एका व्यक्तीचे नाव घेणे संयुक्तिक ठरणार नाही. तपास पुढे सरकेल तसा त्यात कोण होते किंवा कोण नाही हे स्पष्ट होईल. ही काही एकटी खरातची केस नाही. अनेक व्हिडिओ आहेत. भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल. काही गोष्टींना निवडकपणे टाळले जात असल्याचे समोर येत आहे.
पण मुख्यमंत्र्यांनी जे खरे आहे ते व्हिडिओ असो, भ्रष्टाचार असो, हवाला असो किंवा जे काही गोलमाल असो ते पुढे आणले पाहिजे. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने मोठ्या विश्वासाने मतदान केले आहे. त्यांना एवढी मोठी संधी दिली. पण महाराष्ट्राची जी पुरोगामी विचाराची भावना, जो विचार राहिलेला आहे, त्याला सातत्याने काळीमा फासण्याचे काम या सरकारमधील काही लोकांकडून होत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील माणसांचेही नुकसान होत आहे. आम्ही सर्वांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे.
पीडित महिलांना पोलिसांत का जाऊ वाटले नाही?
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, अशोक खरातकडे जाणाऱ्या कोणत्याही महिलेला, जिचे शोषण होत होते, तिला असे का वाटले नाही की आपण कोणत्या तरी व्यक्तीकडे जावे आणि न्याय मागावे. आपण व्यवस्था म्हणून अपयशी ठरलो की, व्यवस्थेतील काम करणारे आपण लोक म्हणून आपण अपयशी ठरलो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शोषण सुरू असताना कुणाला का वाटले नाही की, आपण जाऊन पोलिसांत जाऊन न्याय मागावा. या गोष्टीची समाजात चर्चा झाली पाहिजे. खरातकडे एवढे मोठे राजकीय नेते व अधिकारी व जबाबदार लोक जात होते. त्यामुळे लोकांना आपल्याला न्याय मिळेल याचा विश्वास नव्हता.
हे किती घातक आहे? आपण कितीही नियम व कायदे केले तरी त्याचा उपयोग किंवा आधार, त्याची मदत लोकांना होत नसेल, तर त्यांचा उपयोग काय? आपण सर्वच कायदे सामाजिक परिवर्तनासाठी करतो. त्याची अंमलबजावणी होणार नसेल, तर हे किती चिंताजनक आहे हे मला सांगा. याचे आत्मचिंतन सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही केले पाहिजे, असे सुप्रिया म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App