नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा!!, हाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा असल्याची राजकीय वस्तुस्थिती आता समोर आलीय. Sharad Pawar’s NCP’s new funda
शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरणाचा शेवटचा प्रयत्न करून पाहण्यात आला पण सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने दिलेली विलीनीकरणाचा डाव बारगळला म्हणूनच मग सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आतून पोखरायचा नवा “डाव” खेळायला सुरुवात झाली.
– 20 आमदारांची भेट
यातला पहिला भाग म्हणून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीतले 20 आमदार त्यांना भेटायला गेले या सगळ्या आमदारांनी रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाता संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करून सुनेत्रा पवारांवर चौकशीसाठी दबाव वाढविला. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायची सूचना केली. ती त्यांना मान्य करावी लागली. याच दरम्यान रोहित पवारांनी पत्रकार परिषदांचा सिलसिला तसाच सुरू ठेवला ते सीआयडीच्या कार्यालयात सुद्धा पोहोचले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग याची चौकशी करायला बोलवले होते की त्याची बडदास्त ठेवायला बोलावले होते असा बोचरा सवाल करून रोहित पवारांनी सीआयडी चौकशीच्या मुद्द्यावर सुद्धा संशयाचा ठपका लावला.
– चार सेलच्या अध्यक्षांचे राजीनामे
पण त्यापलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आतून पोखरायचा डावही खेळला गेला. अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या तीन सेलच्या अध्यक्षांनी राजीनामे दिले होते, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मोटार सेलचे अध्यक्ष सचिन जाधव, उद्योग सेलचे अध्यक्ष सुभाष मालवणी आणि असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष मनोज व्यवहारे यांचा समावेश होता. या तिघांनीही म्हणे राष्ट्रवादीतल्या पवार कुटुंबीय सोडून अन्य नेत्यांवर आरोप करत राजीनामे दिले होते, पण अजित पवारांनी ते नुसतेच आपल्याकडे ठेवून घेतले होते. मंजूर केले नव्हते, पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर खासदार सुनील तटकरे यांनी तिनही सेलच्या अध्यक्षांचे राजीनामे मंजूर केले. त्यापाठोपाठ आज चौथ्या सेलच्या अध्यक्षांनी सुद्धा सुनील तटकरे यांच्यावर कटाक्ष करत राजीनामा दिला. महापालिका कर्मचारी सेलचे अध्यक्ष गौतम खरात यांनी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांवरच आरोप केला. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी पक्ष संघटनेत लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. यानिमित्ताने सुनील तटकरे यांच्याभोवती संशयाचे नवे जाळे टाकण्यात आले.
– भाजपने मारून ठेवलीये पाचर
या सर्व घडामोडींमधून सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली आणि आता सुनील तटकरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करायचा “डाव” खेळला गेलाय. जेणेकरून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सूत्रे हातात घ्यावीत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दूर करावे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची वर्णी सत्ता पदांवर लावावी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी अखंड होतील. सुनेत्रा पवारांच्या हातातली सत्तेची सूत्रे कमकुवत होतील आणि सत्तेची सूत्रे शरद पवार गटाच्याच हातात राहतील. पण एवढे करूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना हवे तसे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होण्याची शक्यता फारच धूसर आहे. कारण त्यात प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांनी घातलेला खोडा नाही, भाजपा नावाच्या बलाढ्य पक्षाने मारलेली पाचर आहे आणि ती पाचर काढणे कुठल्याच पवारांचा घास उरलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App