जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल संशय – संदेह; तितके राष्ट्रवादीचे विलीनीकरण दूरच दूर!!

नाशिक : जितके अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल कुणी संशय आणि संदेह पसरवेल तितके दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण दूरच जाईल. कारण या संशय आणि संदेहातून राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाला घेरण्यासाठी “डाव” खेळला जाईल. माध्यमांमध्ये त्याची जोरदार चर्चा होईल, पण या “डावाचा” उलटा परिणाम म्हणून राष्ट्रवादींचे विलीनीकरण लांबत जाईल. महाराष्ट्राच्या राजकारणात हा खेळ जितका सुरू करणे सोपे असेल, तितका तो थांबविणे अवघड ठरेल!!

अजितदादांच्या अपघाती अकाली एक्झिट नंतर राजकारणाला जे उधाण आले, त्यातून त्यांच्या विमान अपघाताबद्दल संशय संदेह व्यक्त करणे आणि त्याचबरोबर “अजितदादांच्या मनातली शेवटची इच्छा” या शब्दांचे भांडवल करून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीवर कब्जा करणे हा “खेळ” महाराष्ट्रात रंगलाय. त्याच खेळाची पुढची कडी म्हणून, ज्यावेळी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची अधिकृत सूत्रे हाती घेत आहेत, त्याच दिवशी रोहित पवारांनी दुपारी 4.00 वाजता पत्रकार परिषद घेण्याची वेळ आणली. या पत्रकार परिषदेतून ते अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी संशय आणि संदेह निर्माण करून मोठा “राजकीय बॉम्ब” टाकणार असल्याचे त्यांनी स्वतःच ट्विटरवरून जाहीर केलेय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे काही दिवस या “राजकीय बॉम्बचे” “किरकोळ” किंवा माध्यमांच्या दृष्टीने “मोठे” स्फोट होत राहणार हेच राजकीय वास्तव आज तरी समोर आलेय.

– दोन राष्ट्रवादींमध्ये पाचर मारायची संधी

पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे जे “राजकीय भूत” अजित पवारांच्या इच्छेच्या नावाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उभे केले आहे, ते विलीनीकरण मात्र या संशय आणि संदेह निर्मितीमुळे दूर दूर जाणार आहे. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जेवढा अजित पवारांच्या विमान अपघाताच्या विषयी संशय निर्माण करत राहतील, तेवढे भाजपचे नेते दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण दूर सारत राहतील. ते विलीनीकरण घडवू देणार नाहीत. अजित पवारांच्या विमाना अपघाताचा विषय भाजप आपल्या अंगाला चिकटवून घेणार नाही. उलट या विषयामुळे सध्याच्या दोन राष्ट्रवादींमध्येच मोठी पाचर मारेल.

– सुनेत्रा पवार – प्रफुल्ल पटेल भेट

कारण राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा विषय फक्त शरद पवार किंवा त्यांच्या चेल्यांच्या हातातलाच उरलेला नसून, तो सुनेत्रा पवारांच्या हातात आणि त्याहीपेक्षा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या हातात कधीच निघून गेलाय. आज ज्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेण्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ज्यावेळी चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतले, त्यावेळी त्यांच्या समवेत प्रफुल्ल पटेल होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांची ही भेट बऱ्याच दिवसांनी होत होती. या भेटीत बरेच काही दडलेय. सिद्धिविनायक आणि चैत्यभूमीच्या दर्शनानंतर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व आमदार मंत्री तिथे हजर राहिले. याचाही वेगळा राजकीय संदेश महाराष्ट्रात गेलाय, जो विलीनीकरणाला प्रतिकूल ठरलाय. अजितदादांची अख्खी राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांभोवती एकवटलीये.

– देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्रीच दिल्ली दौरा उरकून घेतला आणि या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली आणि ते पहाटे परत मुंबईला आले.

– रोहित पवारांची आज पत्रकार परिषद, पण…

या सगळ्या घटना घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी आज दुपारी 4.00 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पत्रकार परिषद घेऊन कितीही “मोठ्ठा” “राजकीय बॉम्ब” टाकला आणि अजित पवारांच्या विमान अपघाताच्या विषयी संशय आणि संदेह व्यक्त केला, तरी त्यातून फक्त माध्यमांमध्ये “बॉम्बस्फोट” होण्यापेक्षा अन्य कुठल्या राजकीय परिणाम होणे कठीण आहे. राष्ट्रवादीचे विलीनीकरण हा ना शरद पवारांचा घास उरला आहे, तो रोहित पवारांचा घास कधीच नव्हता. त्यामुळे विलीनीकरण नावाचे “भूत” फक्त माध्यमांमध्ये धुमाकूळ घालत राहील. राजकीय दृष्टीने मात्र ते “भाजपच्या बाटलीतच” बंद करून ठेवले जाईल.

Rohit Pawar Statement and today Press conference

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात