विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2030 Commonwealth भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. २०३० च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन भारतातील अहमदाबाद शहरात होणार असल्याची शिफारस कॉमनवेल्थ स्पोर्टच्या कार्यकारी मंडळाने केली आहे. यामुळे भारत पुन्हा एकदा जागतिक क्रीडा नकाशावर तेजाने झळकणार आहे.2030 Commonwealth
२०३० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा १०० वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यामुळे ही आवृत्ती विशेष मानली जात आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन येथे झाली होती. आता शताब्दी वर्षात या प्रतिष्ठित स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाल्यास, तो देशाच्या क्रीडा क्षमतेचा आणि विकासाच्या दृष्टीकोनाचा मोठा पुरावा ठरेल. या संदर्भातील अंतिम मतदान २६ नोव्हेंबर २०२५ रोजी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहे.2030 Commonwealth
या यजमानपदासाठी भारतातील अहमदाबाद आणि नायजेरियातील अबुजा ही दोन शहरे स्पर्धेत होती. दोन्ही शहरांनी ‘गेम्स रिसेट’ या नाविन्यपूर्ण मॉडेलखाली प्रस्ताव सादर केला. परंतु, पायाभूत सुविधा, तांत्रिक क्षमता, क्रीडांगणांची तयारी आणि प्रशासनिक पारदर्शकता या निकषांवर अहमदाबादची दावेदारी जास्त प्रभावी ठरली.
कॉमनवेल्थ स्पोर्टच्या मूल्यांकन समितीने भारताचा प्रस्ताव सर्वोत्तम ठरवला आणि कार्यकारी मंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन (भारत)च्या अध्यक्षा डॉ. पी. टी. उषा यांनी सांगितले, “भारताला २०३०च्या कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्याचा मान मिळणे हे अभिमानास्पद आहे. या स्पर्धेमुळे देशाची आयोजन क्षमता आणि जागतिक स्तरावरील नेतृत्व सिद्ध होईल. तरुणाईला नवी प्रेरणा मिळेल आणि भारताचा ‘विकसित भारत २०४७’चा संकल्प अधिक दृढ होईल.”
केंद्र सरकारने आधीच २०३० राष्ट्रकुल स्पर्धांसाठी अर्ज सादर करण्यास मंजुरी दिली आहे. क्रीडा मंत्रालयाने गुजरात सरकारला सर्व आवश्यक आर्थिक सहाय्य, करार आणि हमीपत्रे देण्यास संमती दर्शवली आहे.
कॉमनवेल्थ स्पोर्टचे कार्यवाहक अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी नायजेरियाच्या अबुजाचा प्रस्तावही स्तुत्य असल्याचे सांगितले आणि भविष्यात २०३४ मध्ये आफ्रिकन देशाला यजमानपद देण्याची शक्यता व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App