विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया सतत आपल्या टार्गेटवर ठेवली. त्यांनी भाजपपासून निवडणूक आयोगापर्यंत सगळ्यांवर आरोप केले. आता त्यापलीकडे जाऊन राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात वाढलेल्या मतदानावरून गंभीर आरोप केले. पण हे आरोप करताना त्यांनी न्यूजलॉन्ड्री या विदेशी फंडिंग स्वीकारणाऱ्या मीडियातल्या बातमीचा हवाला दिला. ही तीच न्यूजलॉन्ड्री आहे, जिच्या पत्रकाराला जमाते इस्लामी नावाच्या संघटनेने भारतात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, नागरी स्वातंत्र्य जपण्यासाठी पत्रकारिता केल्याबद्दल पुरस्कार दिला होता. या न्यूजलॉन्ड्रीतल्या बातमीच्या हवाल्याने राहुल गांधींनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. न्यूजलॉन्ड्रीने आतापर्यंत फक्त मोदीविरोधी अजेंडा चालविला. राहुल गांधींनी त्या मीडियाच्या बातमीचा हवाला देत फडणवीसांवर आरोप केला. Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 16 जागा मिळाल्या. त्यांनी एका दैनिकात थेट लेख लिहून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवले. आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत फक्त 5 महिन्यांमध्ये 8 % वाढ झाली. काही बुथवर 20 ते 50 % नी मतदार वाढले. काही अनोळखी माणसांनी मतदान केल्याची बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनी ही स्पष्ट केले आहे. न्यूज लाँड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधींनी हा आरोप केला. ‘निवडणूक आयोग गप्प का? ही मतदारांची एका अर्थी चोरीच’ असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय असं राहुल गांधी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस किती मताधिक्क्याने विजयी?
नागपूरचा दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. देवेंद्र फडणवीस यांनी या मतदासंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 42 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांनी 1,29,401 मतं मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराला 89,691 मतं मिळाली. 1978 पासून 8 वेळा भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. मात्र याचा उल्लेख राहुल गांधींनी लेखात केला नाही.
निवडणूक आयोगाने काय म्हटलं?
राहुल गांधी यांनी लेख लिहून आरोप केले. त्यावर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पूर्ण पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. निवडणूक घेताना पूर्ण नियमांचे पालन करण्यात आले, असं निवडणूक आयोगाने म्हटलं. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी, मतदानाची प्रक्रिया तसेच मतमोजणी ही लोकप्रतिनिधी कायदा 1950, निवडणूक नोंदणी नियम 1960 या कायद्यांच्या अधीन राहूनच करण्यात आली. मतदानाच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App