विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुघल सम्राट औरंगजेबाने काशी विश्वनाथासकट अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंविरोधात जिहाद केला. औरंगजेबानेच छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली. त्या औरंगजेबाच्या विरोधात संपूर्ण देशात प्रचंड संताप असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी मात्र औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली.
औरंगजेब हा प्रत्यक्षात उत्तम प्रशासक होता. त्याची छत्रपती संभाजी महाराजांशी लढाई धार्मिक नव्हती, असे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी बरळले. विधिमंडळ परिसरात बोलताना अबू आझमी यांनी अनेक ऐतिहासिक “जावईशोध” लावले. औरंगजेबाच्या काळात भारतात अनेक मंदिरं बांधली. त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 24 % इतका होता, या “जावईशोधांचा” त्यात समावेश होता. आझमी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट उसळली.
अबु आझमी म्हणाले :
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती. त्याच्या काळात भारताला सोने की चिडीयाँ म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी 24 % इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती, तर ती राजकीय सत्तेसाठी होती.
देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मुस्लीम अशी नव्हती.
यावेळी अबू आझमी यांना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रकारे अनन्वित छळ करून मारले, ती कृती योग्य होती का??, असा सवालही विचारण्यात आला. मात्र, अबू आझमी या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून निघून गेले.
महाराष्ट्रात प्रचंड संताप
अबू आझमी यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात प्रचंड संताप उसळला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांमध्ये त्यांचा निषेध केला. ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा अनन्वित छळ करून त्यांना मारले त्याला उत्तम प्रशासक म्हणणे हा देशद्रोह आहे अबू आजमी यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील अबू आझमी यांना सडकून काढले. अबू आझमी यांना इतिहास माहिती नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील, तेव्हा मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे, असे राम कदम म्हणाले. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे कैदेत ठेवलं, त्यांचा कशाप्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना माहिती नाही का??, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
इंद्रजीत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा
करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांच्याकडून खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आली आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण आणि राजपूत यांच्याविरोधात युट्यूब चॅनल मध्ये चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. ते वारंवार ब्राह्मण आणि राजपूत यांच्याविरोधात वक्तव्यं करतात. विदेशी लेखकांचा इतिहास वाचून इंद्रजीत सावंत बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर समाजात दुही माजवली जात असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार करनी सेनेने पोलिसांत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App