लॉकडाऊनच्या निर्णयाला पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यामुळे कोविड – 19 चा प्रसार मर्यादित करण्यात भारताने काही प्रमाणात यश संपादन केले आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. मात्र जागतिक परिस्थिती अद्यापही समाधानकारक नाही. काही देशांमध्ये विषाणूच्या प्रसाराची पुन्हा लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या निर्णयाला पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यामुळे कोविड – 19 चा प्रसार मर्यादित करण्यात भारताने काही प्रमाणात यश संपादन केले आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. मात्र जागतिक परिस्थिती अद्यापही समाधानकारक नाही. काही देशांमध्ये विषाणूच्या प्रसाराची पुन्हा लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर कोविड -19 विरोधात लढा देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यावेळी त्यांच्यासमवेत होते.
पंतप्रधान म्हणाले, कमीतकमी जीवितहानी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. पुढील काही आठवड्यांत चाचणी, शोध , अलगीकरण आणि विलगीकरणावर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जावे. आवश्यक वैद्यकीय उत्पादनांचा पुरवठा कायम राखणे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी कच्चा माल उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोविड -19 रूग्णांसाठी स्वतंत्र आणि समर्पित रुग्णालय सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्यासाठी ,आयुष डॉक्टरांच्या रिसोर्स पूलची मदत घेणे, ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करणे आणि निम-वैद्यकीय कर्मचारी , एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांचा उपयोग करून घ्यायला हवा.
जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन गट स्थापन करण्याची आणि जिल्हा निगराणी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. चाचणीसाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून माहिती घेतली जावी. यामुळे जिल्हा, राज्य आणि केंद्राच्या माहितीत मेळ राहील. बँकांमधील गर्दी टाळण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना टप्याटप्याने निधी जारी करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
पंतप्रधान म्हणाले की, पिकाची कापणी करण्याची ही वेळ आहे हे लक्षात घेऊन सरकारने लॉकडाऊनमधून थोडी सवलत दिली आहे. मात्र शक्य तितके सामाजिक अंतर कायम राखणे आणि त्यावर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी राज्यांना धान्य खरेदीसाठी एपीएमसी व्यतिरिक्त अन्य मंचाचा विचार करायला हवा. राईड शेअरिंग् प्रमाणे ग्रामीण भागासाठी पूलिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या शक्यतेची चाचपणी करायला हवी.
या संकटकाळात नेतृत्व, आणि सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. लॉकडाउनचा धाडसी आणि वेळेवर निर्णय घेतल्यामुळे देशात विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत झाली अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली. सामाजिक अंतर राखणे, संशयित रुग्णांचा शोध घेणे, निजामुद्दीन मरकझमुळे उद्भवलेल्या संशयित प्रकरणांची ओळख पटवणे आणि त्यांचे विलगीकरण , समाजातील संसर्ग रोखणे , वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढविणे, वैद्यकीय मनुष्यबळ बळकट करणे, टेली-मेडिसिनची व्यवस्था करणे, मानसिक आरोग्य समुपदेशनाची तरतूद, गरजूना अन्न आणि अन्य आवश्यक वस्तूंचे वितरण करणे आणि स्थलांतरित कामगारांची काळजी घेण्यासंबंधी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. आपत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय तसेच आर्थिक संसाधने जमवणे महत्वाचे असल्याचे राज्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले की, युद्धपातळीवर काम करणे गरजेचे असून , विषाणूचे हॉटस्पॉट्स ओळखणे, त्यांना घेराव घालणे आणि विषाणूचा प्रसार होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. , देशभरात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे. कोविड -१९ ने आपल्या विश्वासावर आणि विचारांवर हल्ला केला आहे. आपल्या जीवनशैलीसमोर धोका निर्माण केला आहे. महामारीच्या विरुद्ध लढाईत समुदाय-दृष्टिकोनावर आधारित संघटित आघाडी उभारण्यासाठी त्यांनी राज्य, जिल्हा, शहर आणि तालुका स्तरावरील धार्मिक नेते आणि समाजकल्याण संस्था यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन नेत्यांना केले.
लॉकडाउन संपल्यानंतर विखुरलेली लोकसंख्या पुन्हा टप्प्याटप्प्याने एकत्र आणण्यासाठी राज्य आणि केंद्राने समान रणनीती आखणे महत्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी राज्यांना विचारमंथन करण्याचे आणि निकास रणनीतीसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केले. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतराच्या महत्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही राज्यांमध्ये लॉकडाऊन अधिक कठोरपणे राबविण्याची गरज व्यक्त केली. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी महत्वाची असल्याचे सांगितले. केंद्रीय आरोग्य सचिवांनी भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, निजामुद्दीन मरकझमधून रोगाचा झालेला प्रसार, विषाणूचा आणखी प्रसार झाल्यामुळे उद्भवणार्या वैद्यकीय प्रकरणांचा सामना करण्याची तयारी आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संसर्ग साखळी तोडण्याची गरज असल्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App