गांधी परिवारवादाचे ठीक आहे, पण “असे” राजकीय वारसे सोडून दिल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलित मिळते त्याचे काय…??


गांधी परिवाराचा सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, नरसिंह राव या नेत्यांवर राग आहे. अगदी मनापासून राग आहे, मान्य… पण गुस्सा अकल को खा जाता है… या मुहावऱ्याप्रमाणे गांधी परिवाराच्या रागाने त्यांचीच राजकीय अक्कल खाऊन टाकली आहे. त्यातूनच ते या महान नेत्यांचे राजकीय वारसे सोडून देत आहेत. त्याचा आयता राजकीय फायदा चंद्रशेखर राव आणि नरेंद्र मोदींसारखे नेते घेत आहेत… हे या गांधी परिवाराला कोणी जाऊन सांगेल काय…?? Nehru – Gandhi family unnecessarily loosing political legacy of sardar patel, netaji subhash chandra bose and p. v. narasimha rao


गांधी परिवाराने जरूर काँग्रेस आपल्याच मर्जीने चालवावी. गांधी परिवारवादाचे देखील ठीक आहे, पण ते आणि काँग्रेसचे नेते असे किती राजकीय वारसे सोडून देऊन विरोधकांच्या हातात आयते कोलित देत राहणार आहेत…??, असे आता खरेच विचारायची वेळ आली आहे.

कारण काल पी. व्ही. नरसिंह रावांच्या जन्मशताब्दीची सांगता झाली. या कार्यक्रमाला काँग्रेसजनांनी अजिबात महत्त्व दिले नाही. कारण गांधी परिवाराचे नरसिंह रावांशी राजकीय वैर राहिले. हे वैर नरसिंह राव पंतप्रधानपदावर होते, तोपर्यंत ठीक होते. अगदी नरसिंह राव जिवंत असेपर्यंत असणेही समजू शकते. पण ते गेल्यानंतर देखील तसेच वैर चालविण्याने काँग्रेसने स्वतःचेच किती राजकीय नुकसान करून घेतले ते कळत नाही का गांधी परिवाराला…??!!

नरसिंह रावांचा अख्खा राजकीय वारसा काँग्रेसचा आहे. त्यांची अख्खी राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये इंदिराजी – राजीवजींच्या छायेत गेली. त्यांचे राजकीय वैर फक्त सोनिया गांधींशी राहिले. पण म्हणून त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणांचा राजकीय वारसा काँग्रेसने सोडून द्यायचा…??

तो नाकारण्याचे काँग्रेसने काहीच कारण नव्हते. पण गांधी परिवाराच्या अहंकारामुळे हा अख्खा राजकीय वारसा नाकारला आणि तो आयता चंद्रशेखर राव यांच्या पथ्यावर पडला. चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्र समितीचा आणि नरसिंह रावांचा दूर दूर पर्यंत राजकीय संबंध नाही. पण काँग्रेसने स्वतःहून सोडून दिलेला वारसा आयता उचलून चंद्रशेखर राव हे काँग्रेसवरच राजकीय तलवार चालवतात तेव्हा ते चंद्रशेखर राव यांचे राजकीय कर्तृत्व नसते, तर काँग्रेसजनांचा तो राजकीय मुर्खपणा असतो. गांधी परिवाराचा हा खुळा अहंकार अंतिमतः स्वतःच्याच राजकीय हिताला हानी पोहोचविणारा ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे.

इथे गांधी परिवाराने नरसिंह राव यांची वैयक्तिक भलामण करण्याची गरज नाही. पण त्यांचे सरकार हे काँग्रेसचे सरकार होते. त्यांनी काँग्रेसच्याच नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना हाताशी धरून आर्थिक सुधारणा घडवून आणल्या, हे नुसते म्हणायला गांधी परिवाराचे आणि काँग्रेसजनांचे काय जाते…??!! त्याला काय विशेष राजकीय अक्कल लागते, हे समजत नाही.

गांधी परिवाराच्या लेखी आणि त्यामुळे काँग्रेसजनांच्या लेखी नरसिंह रावांची राजकीय किंमत “शून्य” आहे, असेलही… पण हीच त्यांची राजकीय “शून्य” किंमत चंद्रशेखर रावांसारखे दुसऱ्या पक्षाचे नेते उचलून धरतात तेव्हा तेलंगणच्या राजकारणात ती “१०० नंबरी” ठरते ना… हे काँग्रेसजनांना आणि गांधी परिवाराला समजत नाही काय…??

बरं हे फक्त नरसिंह रावांच्या बाबतीत झालेय असे नाही. गांधी परिवाराच्या राजकीय रडारवर राहिलेल्या नेत्यांच्या राजकीय कर्तृत्वाकडे आणि वारसाकडे गांधी परिवाराने आणि काँग्रेसने सतत दुर्लक्ष केल्याने त्या सगळ्या नेत्यांचा राजकीय वारसा आयता विरोधकांच्या हातात पडला आहे.

सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्याचीच तर ठळक उदाहरणे आहेत. या दोन्ही नेत्यांची राजकीय हयात काँग्रेसमध्ये गेली. आपल्यापेक्षा या दोन्ही नेत्यांची प्रतिमा मोठी होऊ नये, पंडित नेहरू राजकारण खेळले. इथपर्यंत ठीक आहे. तो राजकारणाचा अपरिहार्य भागही मानता येईल. पण म्हणून नेहरूंच्या वारसांनी काँग्रेस कायमची ताब्यात घेतल्यावर सरदार आणि सुभाषबाबू यांचा राजकीय वारसा नाकारण्याचे काहीही कारण नव्हते. त्यांचे पैतृक वारसदार कधीही गांधी परिवाराला चॅलेंज ठरतील, एवढे मोठे नेते कधी झाले नाहीत. होण्याची शक्यताही नव्हती.
सरदार पटेलांचे चिरंजीव डाह्याभाई पटेल आणि कन्या मणिबेन पटेल हे नेहरू – गांधी परिवाराच्या नेतृत्वाखाली खासदार राहिले. या पेक्षा त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा देखील अधिक राहिली नाही. मणिबेन पटेल केवळ अखेरच्या काळात संघटना काँग्रेसच्या खासदार राहिल्या. पण त्यांची राजकीय उंची इंदिराजींना चॅलेंज करण्याइतपत कधी वाढली नव्हती, ही वस्तुस्थिती आहे.

जे सरदार पटेलांच्या पैतृक वारसाचे, तेच नेताजींच्या पैतृक वारसांचे. त्यांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा गांधी परिवाराला नेतृत्वासाठी चॅलेंज करण्याइतपत सक्षम राहिली नाही. उलट बोस कुटुंबांत राजकीय मतभेदांची उभी फूट राहिली आहे. त्याचा एक धडा गांधी परिवाराच्या काँग्रेसबरोबर राहिला आहे.

त्यामुळे सरदार आणि नेताजी यांचाही राजकीय वारसा गांधी परिवाराने नाकारण्याचे कारण नव्हते. पण त्यांनी या दोघांचा वारसा नाकारला म्हणून भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो उचलला… यात त्यांचे काय चुकले…??!! गांधी परिवाराच्या लेखी सरदार आणि नेताजी यांच्या राजकीय वारसाची किंमत “शून्य” होती. पण तीच नरेंद्र मोदींच्या हाती गेल्यामुळे “१०० नंबरी” झाली ना… त्याचे काय करायचे…??!!

आज त्या वारशांवर नरेंद्र मोदी हे आयता हक्क सांगत असतील, तर ती मोदींची नव्हे, तर गांधी परिवाराची राजकीय चूक आहे. गांधी परिवाराचा सरदार, नेताजी, नरसिंह राव आणि अन्य काही नेत्यांवर राग आहे. अगदी मनापासून राग आहे, मान्य… एकदम मान्य… पण गुस्सा अकल को खा जाता है… या मुहावऱ्याप्रमाणे गांधी परिवाराच्या रागाने त्यांचीच राजकीय अक्कल खाऊन टाकली आहे. त्यातूनच ते असे वागत आहेत. आणि त्याचा आयता फायदा चंद्रशेखर राव आणि नरेंद्र मोदींसारखे नेते घेत आहेत… हे या गांधी परिवाराला कोणी जाऊन सांगेल काय…??

Nehru – Gandhi family unnecessarily loosing political legacy of sardar patel, netaji subhash chandra bose and p. v. narasimha rao

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात