विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यभर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेला हा टास्क फोर्स राज्यातील सहाही विभागांमध्ये विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक आणि संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधणार आहे.
या संवाद कार्यक्रमाला 12 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून, 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध विभागांमध्ये बैठका आणि चर्चा आयोजित करण्यात येणार आहेत. भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि उमेदवारांच्या अपेक्षा याबाबत या माध्यमातून थेट माहिती घेतली जाणार आहे.
सहाही विभागांत संवाद
उच्चस्तरीय टास्क फोर्सचा दौरा पुढीलप्रमाणे असेल :
पुणे – 12 सप्टेंबर नागपूर – 16 सप्टेंबर अमरावती – 17 सप्टेंबर छत्रपती संभाजीनगर – 21 सप्टेंबर कोकण – 29 सप्टेंबर नाशिक – 30 सप्टेंबर
या दौऱ्यादरम्यान स्पर्धा परीक्षा उमेदवार, विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच भरती प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांकडून सूचना आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
उमेदवारांच्या सूचनांवरून होणार सुधारणा
संवाद कार्यक्रमातून प्राप्त होणाऱ्या सूचना, अडचणी आणि अभिप्रायांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर भरती परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनाला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.
विशेषतः परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकारांना आळा घालणे, पारदर्शकता वाढवणे आणि उमेदवारांचा व्यवस्थेवरील विश्वास मजबूत करणे, यावर टास्क फोर्सकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या दृष्टीने या संवाद कार्यक्रमाकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App