विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात Gen Z अर्थात तरुण पिढीसोबत संवाद साधला. यावेळी तरुणांनी फडणवीस यांना त्यांच्या राजकीय प्रवासासह यशानंतर येणारा दबाव कसा हाताळतात, याबाबत प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी आपल्या राजकीय जीवनातील विविध अनुभव सांगत “राजकारण हा माझ्यासाठी व्यवसाय नाही, तर मिशन आहे,” असे स्पष्ट केले. Devendra Fadnavis
यावेळी बोलताना फडणवीस यांनी भारताच्या लोकशाही आणि संविधानाच्या ताकदीचाही उल्लेख केला. “जो देवेंद्र फडणवीस कधी नगरसेवक होईल, असा विचारही करू शकत नव्हता, तो मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचला. गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. ही भारताच्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद आहे,” असे ते म्हणाले.
आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगताना फडणवीस म्हणाले की, राजकारणात प्रवेश केला तेव्हा सत्तेत येण्याचा विचारही केला नव्हता. विचारांनी प्रेरित होऊन राजकारणात आलो. त्यावेळी विरोधी पक्षातच राजकारण करायचे, असे वाटत होते. आंदोलने, संघर्ष आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देत असताना जनतेने विश्वास दाखवला आणि पायरी-पायरीने पुढे जात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली, असे त्यांनी सांगितले.
‘लोकशाही कोणालाही मुख्यमंत्री बनवू शकते’
तरुणांना प्रेरणा देताना फडणवीस यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे कौतुक केले. “इथे बसलेली कोणतीही व्यक्ती मनात पक्के ठरवेल, तर आपली लोकशाही आणि संविधान त्याला मुख्यमंत्री बनवू शकते. त्याला कोणीही रोखू शकत नाही,” असे ते म्हणाले.
‘दबाव कसा हाताळायचा हे सुरुवातीपासूनच शिकलो’
राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील दबावाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी त्यांच्या तरुणपणीच्या आंदोलनांचा किस्सा सांगितला. राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे मोठे माध्यम असल्याचा आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी सांगितले की, ते १८ वर्षांचे असताना श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात सहभागी झाले होते. सुमारे १० हजार तरुण जम्मूच्या दिशेने गेले होते. उधमपूर येथे त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर पायी श्रीनगरकडे जाण्याचा प्रयत्न केला असता लष्कराने त्यांना अडवून अटक केली. पुढे दिल्लीला आल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालून लाल चौकात तिरंगा फडकवण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर १९९२ मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला, असा उल्लेख फडणवीस यांनी केला.
रामजन्मभूमी आंदोलनाचा अनुभवही सांगितला
फडणवीस यांनी आपल्या २०व्या वर्षातील रामजन्मभूमी आंदोलनातील सहभागाचाही उल्लेख केला. प्रयागराजहून अयोध्येच्या दिशेने जात असताना आंदोलनादरम्यान गोळीबार आणि लाठीचार्जचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि बदायूं येथील केंद्रीय कारागृहात १८ दिवस राहावे लागल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
१९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडला गेला, त्यावेळी आपण तिथे उपस्थित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जेव्हा सुरुवातच अशा संघर्षातून होते, तेव्हा दबाव कसा हाताळायचा हे आपोआपच शिकता येते,” असे सांगत फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातील संघर्ष आणि अनुभव Gen Z समोर मांडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App