वृत्तसंस्था
नवी दिल्ली : India-UK Free भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) आता 15 जुलै 2026 पासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे अंमलबजावणीची तारीख जाहीर केली असून, या करारामुळे भारत आणि यूकेमधील व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.India-UK Free
फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान Keir Starmer यांच्यात चर्चा झाल्यानंतर या कराराच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. हा करार दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.India-UK Free
या कराराचा सर्वसामान्य ग्राहकांवरही थेट परिणाम होणार आहे. भारतात आयात होणाऱ्या ब्रिटिश वस्तूंवरील शुल्क कमी केल्यामुळे स्कॉच व्हिस्की, ब्रिटिश कार, इलेक्ट्रिक वाहने, सौंदर्यप्रसाधने, चॉकलेट्स आणि इतर काही प्रीमियम उत्पादनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
करारानुसार स्कॉच व्हिस्कीवरील आयात शुल्कात मोठी कपात केली जाणार आहे. सध्या 150 टक्के असलेले शुल्क टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असून, सुरुवातीला ते 75 टक्क्यांपर्यंत खाली येईल आणि पुढील काळात 40 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात स्कॉच व्हिस्की तुलनेने स्वस्त उपलब्ध होऊ शकते.
ब्रिटिश वाहन उत्पादकांनाही या कराराचा फायदा होणार आहे. ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या वाहनांवरील आयात शुल्क कोटा पद्धतीखाली 100 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे. त्यामुळे काही ब्रिटिश कार मॉडेल्सच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, भारतीय निर्यातदारांसाठीही हा करार फायदेशीर ठरणार आहे. वस्त्रोद्योग, औषधनिर्मिती, अभियांत्रिकी उत्पादने, रत्न-दागिने, पादत्राणे आणि समुद्री उत्पादनांसह अनेक क्षेत्रांतील भारतीय वस्तूंना ब्रिटनमध्ये जवळपास शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे भारतीय निर्यात वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ब्रिटिश सरकारच्या अंदाजानुसार या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारात मोठी वाढ होईल. दीर्घकालीन पातळीवर द्विपक्षीय व्यापार अब्जावधी पौंडांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय, भारत आणि यूके यांच्यातील सामाजिक सुरक्षा करारही 15 जुलैपासून लागू होणार आहे. यामुळे ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान भरण्यापासून दिलासा मिळणार असून, त्याचा फायदा हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App