विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी मांडत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करत विरोधकांवरही टीका केली.Devendra Fadnavis
नेहरूंचा विक्रम मोडत मोदींची नवी नोंद
फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ निवडून आलेल्या पंतप्रधानांचा विक्रम मागे टाकला आहे.Devendra Fadnavis
“एखादा नेता किती काळ सत्तेत राहिला यापेक्षा त्या काळात त्याने देशासाठी काय काम केले, हे महत्त्वाचे असते. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक प्रतिमा उंचावली असून देशाला नवी दिशा मिळाली आहे,” असे फडणवीस म्हणाले.
त्यांनी सांगितले की, आज देशातील 22 राज्यांमध्ये एनडीएची सत्ता असून देशाच्या सुमारे 80 टक्के भूभागावर एनडीएचे सरकार कार्यरत आहे.
भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
देशाच्या आर्थिक प्रगतीवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, जागतिक मंदीच्या आव्हानांदरम्यानही भारताचा विकासदर 7 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.
त्यांच्या मते, भारताकडे सध्या 67 लाख कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन साठा असून तो देशाच्या आर्थिक स्थैर्याचे प्रतीक आहे.
’94 टक्के परदेशी कर्ज फेडण्याची क्षमता’
भारताच्या आर्थिक सामर्थ्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “एकेकाळी भारत परदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. मात्र आज देशाकडे इतका परकीय चलन साठा आहे की परदेशी कर्जापैकी सुमारे 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडण्याची क्षमता भारताने निर्माण केली आहे.”
तसेच देशाकडे पुढील 11 महिन्यांच्या आयातीचा खर्च भागवण्याचीही क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला.
डिजिटल व्यवहारांत भारताची आघाडी
फडणवीस यांनी सांगितले की, यूपीआय प्रणालीमुळे डिजिटल व्यवहारांत भारताने जगात मोठी झेप घेतली आहे. आज यूपीआयद्वारे 314 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार होत असून भारताची ही प्रणाली 30 देशांमध्ये वापरली जात आहे. लवकरच ब्राझीलदेखील यूपीआय प्रणाली स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
’25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले’
मोदी सरकारच्या सामाजिक योजनांचा उल्लेख करताना त्यांनी दावा केला की, गेल्या काही वर्षांत 25 कोटी नागरिक तीव्र गरिबीतून बाहेर आले आहेत.
तसेच:
81 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून मदत 4 कोटी घरे पूर्ण, आणखी 3 कोटी घरांचे लक्ष्य प्राप्तिकर सवलतीची मर्यादा 12.75 लाख रुपयांपर्यंत वाढ
अशा विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.
महिला सक्षमीकरणावर भर
फडणवीस म्हणाले की, महिला सक्षमीकरण हे मोदी सरकारच्या धोरणांचे केंद्रस्थान राहिले आहे.
“देशात आतापर्यंत 3 कोटी महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. हा आकडा 6 कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच 32 कोटी महिलांची बँक खाती उघडण्यात आली असून सैन्यातील महिलांची संख्याही लक्षणीय वाढली आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही’
गेल्या 12 वर्षांत केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही गंभीर आरोप सिद्ध झालेला नसल्याचा दावा करत फडणवीस म्हणाले की, डीबीटी (Direct Benefit Transfer) यंत्रणेमुळे लाखो कोटी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचला आहे.
तसेच ‘जेम’ पोर्टलमुळे सरकारी खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढल्याचा दावा त्यांनी केला.
पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक
देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेल्या वाढीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, पूर्वी सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च होत असताना आता हा खर्च 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
“देशात दररोज सरासरी 34 किलोमीटर महामार्ग बांधले जात आहेत. यामुळे विकासाला मोठी गती मिळाली आहे,” असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस-विलीनीकरण चर्चेवर टोला
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
“काँग्रेस हे बुडते जहाज आहे. इतर पक्षांचे नेते इतके अनुभवहीन नाहीत की ते बुडत्या जहाजात पाय ठेवतील,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशी टिप्पणी करत अप्रत्यक्ष निशाणा साधला.
शेतकरी, कर्जमाफी आणि एल निनोवरही भाष्य
पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबतही भूमिका स्पष्ट केली. सरकारने कर्जमाफीसाठी विशेष उपसमिती स्थापन केल्याची माहिती देत, हा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचा दावा त्यांनी केला.
याशिवाय एल निनोच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विशेष टास्क फोर्स स्थापन केली असून जलसंधारणाच्या कामांना गती दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App