विशेष प्रतिनिधी
जळगाव : MLC Election 2026 विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने नाशिकमधील बंडखोरीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले असले, तरी जळगावमधील पेच अद्याप कायम आहे. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांनी अखेर माघार घेतल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला. मात्र, जळगावमध्ये शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अद्याप माघार न घेतल्याने सत्ताधारी गोटात अस्वस्थता वाढली आहे.MLC Election 2026
विशेष म्हणजे रेश्मा काळे या सध्या संपर्काबाहेर असल्याची चर्चा असून, त्यामुळे जळगावमधील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत. या पार्श्वभूमीवर आता जळगावचा तिढा सोडवण्याची जबाबदारी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आल्याचे बोलले जात आहे.MLC Election 2026
फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर नाशिकमध्ये बंड थंडावले
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांनीही मध्यस्थी करत बंडखोरांची समजूत काढली. अखेर दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने नाशिकमधील तणाव कमी झाला.
जळगावमध्ये रेश्मा काळेंची भूमिका कायम चर्चेत
नाशिकमधील प्रश्न मार्गी लागल्यानंतरही जळगावमध्ये मात्र महायुतीची चिंता कमी झालेली नाही. शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जळगावमधील हा गुंता सोडवण्यासाठी आता थेट एकनाथ शिंदे यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडूनही याबाबत हालचाली सुरू असून, शिंदेंच्या सूचनेनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगावचा परिणाम नाशिकवरही होण्याची भीती
राजकीय निरीक्षकांच्या मते, जळगावमध्ये बंड कायम राहिल्यास त्याचे पडसाद नाशिकमध्येही उमटू शकतात. त्यामुळे नाशिकचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनाही ऐनवेळी राजकीय दगाफटका होण्याची धास्ती असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीने नाशिकमध्ये एकजूट दाखवली असली, तरी जळगावमधील असंतोष आणि बंडखोरीचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
‘भाव’ कोसळल्याने मतदार नाराज?
या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांमध्ये वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. नाशिकमध्ये बहुरंगी लढत होणार असल्याच्या शक्यतेमुळे काही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर मतदार मोठ्या अपेक्षेने निवडणुकीकडे पाहत होते.
मात्र बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक सरळसोट होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे मतदारांचा ‘भाव’ अचानक घसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काही राजकीय जाणकारांच्या मते, या घडामोडींमुळे अनेक मतदारांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असून, ही नाराजी मतदानाच्या वेळी व्यक्त झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो.
महायुतीसमोर एकजूट टिकवण्याचे आव्हान
विधान परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महायुतीने नाशिकमधील बंडखोरी नियंत्रणात आणली असली, तरी जळगावमधील पेच अजून सुटलेला नाही. रेश्मा काळे यांची पुढील भूमिका, एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप आणि गुलाबराव पाटील यांची मध्यस्थी यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
त्यामुळे १८ जूनच्या मतदानापूर्वी जळगावचा तिढा सुटतो की महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App