विशेष प्रतिनिधी
मुंबई : मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर करुणा मुंडे यांनी दोघांवर जोरदार टीका केली आहे. राज्यात गलिच्छ राजकारण मुंडे बहीण-भावांनीच केल्याचा आरोप करत त्यांनी दोघांनीही सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे, अशी मागणी केली. तसेच, परळी येथे त्यांच्या राजकीय ‘एक्झिट’साठी स्वतःच्या खर्चाने निरोप सभा आयोजित करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. Karuna Munde
प्रसारमाध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या, “जनतेने तुम्हाला सत्ता दिली, मात्र तिचा योग्य वापर न करता गैरवापर केला. आता जर तुम्हाला खरंच राजकारणातून बाहेर पडायचे असेल, तर परळीत तुमची भव्य निरोप सभा मी माझ्या खर्चाने आयोजित करेन. तुमच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा असेल.”
त्या पुढे म्हणाल्या, “तुमच्या जागी मी काम करून दाखवेन. 2029 ची निवडणूक लढवून जिंकून दाखवेन आणि लोकांसाठी काम कसे करायचे, हेही दाखवून देईन.”
अलीकडेच माजलगाव येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी सध्याच्या राजकारणातील वाढत्या कटुतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जातीपातीचे राजकारण आणि बदलते वातावरण पाहता अनेकदा राजकारणात राहावे की नाही, असा प्रश्न पडतो, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, महापुरुषांच्या विचारांमुळेच आपण राजकारणात टिकून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परळीतील एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनीही राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. “माझे राजकारण माझ्या विचारांशी जुळत नसेल, तर योग्य वेळी मीही ‘एक्झिट’ घेईन,” असे त्या म्हणाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे बीडच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App