विशेष प्रतिनिधी
मुंबई : Badlapur case बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता. या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.Badlapur case
बदलापुरात एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. एका दुसऱ्या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आई-वडिलांनी घेतली होती न्यायालयात धाव
अक्षय शिंदे याला ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. तो शाळेत परिचर होता. सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना वाटेतच पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये चकमकीत शिंदेचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेला अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार चौकशीसाठी एका न्यायालयीन चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने आज आपला अहवाल सादर केला असून एन्काउंटर प्रकरणी 5 पोलिसांना जबाबदार ठरवले आहे.
चौकशी समितीच्या अहवालात काय म्हटले?
अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत, असे फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे, असे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार पोलिस कर्मचारी परिस्थिती सहज हाताळू शकले असते आणि बळाचा वापर न्याय्य ठरू शकत नाही. त्यामुळे राज्याने या पोलिसांवर एफआयआर नोंदवणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
ही बनावट चकमक आहे असे आमच म्हणणे होते. त्यासाठी गुन्हा दाखल करावा. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती, असे अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितले. ही बनावट चकमक असून एकप्रकरची हत्या असल्याचे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आले आहे. आता पुढील कारवाईवर आमचे लक्ष असेल, असेही अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App