विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीसंदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, प्रश्नपत्रिका निर्मिती आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांसह विविध मागण्या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्या.MPSC exam
या बैठकीला शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे तसेच विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एमपीएससी परीक्षेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुदृढ करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी राज्यस्तरावर सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीत यूपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटीचे प्राध्यापक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समितीचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. ही समिती राज्यातील विविध भागात जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेणार आहे. पुण्यातही समिती भेट देणार आहे.
दरम्यान, परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाचीही सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गैरप्रकारात आयोगातील अथवा आयोगाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टांचे चीज होईल, अशाच सुधारणा आम्ही करीत आहोत. विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रश्नपत्रिका निर्मितीपासून परीक्षा प्रक्रियेपर्यंत आवश्यक सुधारणा सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन तातडीने लागू करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App