विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठरावीक अंतराने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भूकंपाचा धक्का जाणवताच काही नागरिक घराबाहेर पडले. नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत भूकंपाचे कंपन जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नाशिक आणि गुजरातच्या परिसरात भूगर्भातील हालचाली वाढल्यामुळे अशा स्वरूपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याचे भूकंप अभ्यासक डॉ. किरणकुमार जोहार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत झालेल्या मोठ्या पावसामुळे पाणी जमिनीत झिरपले असून, त्याचाही भूगर्भातील हालचालींवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठरावीक अंतराने सौम्य धक्के जाणवणे ही काही अंशी दिलासादायक बाब असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. जोहार यांनी सांगितले. आगामी काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या शनिवारी रात्रीही नाशिक जिल्ह्यात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. नाशिक शहरातील इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा या भागांसह ग्रामीण परिसरातही धक्के जाणवले होते. काही घरांमध्ये भांडी पडल्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
आता पुन्हा 3.4 रिश्टर स्केलच्या धक्क्याने नाशिक हादरल्याने वारंवार जाणवणाऱ्या भूकंपांच्या मालिकेची चर्चा सुरू झाली आहे. नाशिक आणि गुजरात परिसरातील भूगर्भातील हालचालींवर तज्ज्ञांचे लक्ष असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App