विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ढासळलेली प्रतिमा सावरण्यासाठी आता प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार आणि जनसुराज पक्षाचे संस्थापक आमदार प्रशांत किशोर मैदानात उतरणार का, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. Prashant Kishor
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी प्रदीर्घ बंद दाराआड चर्चा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षाची निवडणूक रणनीती, राज्यव्यापी जनमत सर्वेक्षण आणि संघटनात्मक बांधणी या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या भेटीनंतर प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे राजकीय सल्लागार होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र पक्षाकडून किंवा किशोर यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अजित पवार यांनी पक्षफुटीनंतर निवडणूक प्रचार आणि प्रसिद्धीची जबाबदारी नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स्ड’ कंपनीकडे सोपवली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अरोरा यांना अधिकृतपणे रणनीतिकार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
मात्र सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘डिझाईन बॉक्स्ड’चे काम थांबवण्यात आल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर पक्षाला नवी राजकीय दिशा देण्यासाठी पार्थ पवार हे अनुभवी रणनीतिकाराच्या शोधात असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही महिन्यांत पक्षातील अंतर्गत मतभेद वारंवार समोर आले आहेत. आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेतृत्व, निर्णयप्रक्रिया आणि आगामी राजकीय वाटचालीबाबत संभ्रम असल्याची चर्चा आहे. यामुळे जनतेमध्ये पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी स्वतंत्र राजकीय रणनीती आणि आक्रमक प्रचारयंत्रणा उभी करण्याची गरज नेतृत्वाला भासत असल्याचे बोलले जात आहे.
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची प्रशांत किशोर यांच्यासोबतची ही पहिलीच बैठक नाही. यापूर्वी मे महिन्यातही दोन्ही नेत्यांनी किशोर यांची मुंबईत भेट घेतली होती. त्या भेटीमुळेही राष्ट्रवादीच्या एका गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे वृत्त होते.
त्यामुळे गुरुवारची बैठक ही केवळ सदिच्छा भेट नसून राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय पुनर्बांधणीचा भाग असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बांकीपूर विजयाने ‘पीके’चे राजकीय वजन वाढले
प्रशांत किशोर यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवत प्रथमच विधानसभेत प्रवेश केला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार त्यांनी ६४,१५१ मते मिळवत १९,३२४ मतांच्या फरकाने विजय नोंदवला. हा जनसुराज पक्षाचा पहिला विधानसभा विजय ठरला.
या विजयानंतर रणनीतिकारापासून थेट निवडून आलेल्या नेत्यापर्यंतचा किशोर यांचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षाला सल्ला देण्यासाठी ते कितपत सक्रिय भूमिका स्वीकारतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रशांत किशोर यांनी २०२१ मध्ये व्यावसायिक निवडणूक रणनीतिकार म्हणून काम थांबवत सक्रिय राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे औपचारिक सल्लागार बनतील की केवळ अनौपचारिक मार्गदर्शन करतील, याबाबत पक्षातही संभ्रम असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App