विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘तिरंगा रॅली’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. हातात तिरंगा घेऊन ते या रॅलीत सहभागी होणार असून, सुमारे 20 ते 25 हजार युवक-युवतींच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
देशभरात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भाजपने हे विशेष अभियान हाती घेतले आहे. त्यामध्ये मुंबईतील तिरंगा रॅली हे प्रमुख आकर्षण ठरणार असून, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हजारो तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात यात सहभागी होणार आहेत.
याशिवाय 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक पदाधिकारी आपल्या-आपल्या जिल्ह्यांतील रॅलींमध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यात या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानात विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App