विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता अधिकच चिघळला असून, काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडीया’ या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या वक्तव्याबद्दल काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. Gungi Gudiya
वादाची सुरुवात कशी झाली?
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मंत्री धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पत्रकाराला बोलण्यापासून रोखल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महायुती सरकारवर टीका करत, “धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का?” असा सवाल उपस्थित केला.
याच टीकेदरम्यान काँग्रेसने राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडीया’ असा केला. त्या अजून किती दिवस या भूमिकेत राहणार, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला.
रुपाली चाकणकरांचा काँग्रेसवर पलटवार
काँग्रेसच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरून काँग्रेसवर तीव्र टीका केली.
चाकणकर म्हणाल्या, “विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करते, हीच त्यांची खरी ओळख आहे. आदरणीय दादांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींची खिल्ली उडवून काँग्रेसने आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवले आहे.”
त्यांनी पुढे म्हटले की, वैयक्तिक दुःखावर मात करून जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या एका महिलेचा अपमान करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब आहे. महिलांचा सन्मान ही राज्याची परंपरा असून, अशा प्रकारची भाषा महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
जाहीर माफीची मागणी
रुपाली चाकणकर यांनी काँग्रेसने आपल्या वक्तव्याबद्दल तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. महिलांबाबत अवमानकारक भाषा वापरणे ही काँग्रेसची राजकीय संस्कृती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजकीय वातावरण तापले
‘गुंगी गुडीया’ या टिप्पणीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महिलांच्या सन्मानाचा मुद्दा पुढे करत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, या प्रकरणावर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App