विशेष प्रतिनिधी
मुंबई : Hridaynath Mangeshkar महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गज कलाकारांचा यंदा या पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात येणार असून, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथालेखक सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री राणी मुखर्जी यांची विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.Hridaynath Mangeshkar
सांस्कृतिक कार्य विभागाने बुधवारी पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. चित्रपट, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या विविध क्षेत्रांत दीयर्घकाळ भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याची परंपरा या पुरस्कारांद्वारे कायम ठेवण्यात आली आहे.Hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकरांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरव
यंदाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसंगीताबरोबरच भावगीत, भक्तीगीत आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीमुळे त्यांनी अनेक अजरामर रचना रसिकांना दिल्या. भारतीय संगीतविश्व समृद्ध करण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या सर्वोच्च सन्मानासाठी निवडले आहे.
प्रसाद ओक यांना विशेष योगदान पुरस्कार
मराठी मनोरंजन क्षेत्रात अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही माध्यमांत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रसाद ओक यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाटक, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांत त्यांनी सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कामगिरी केली आहे. अभिनेता म्हणून अनेक गाजलेल्या भूमिका साकारतानाच दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. विशेषतः धर्मवीर आणि धर्मवीर २ या चित्रपटांच्या यशामुळे त्यांच्या दिग्दर्शनाची देशभरात चर्चा झाली होती.
सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार
राज कपूर जीवनगौरव पुरस्कार यंदा हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांना जाहीर झाला आहे. जावेद अख्तर यांच्यासोबतच्या ‘सलीम-जावेद’ या ऐतिहासिक जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला नवे युग दिले. शोले, दीवार, जंजीर, डॉन, त्रिशूल, शक्ती यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या कथा आणि पटकथांनी हिंदी सिनेमाचा चेहरामोहराच बदलून टाकला. भारतीय चित्रपटसृष्टीतील पटकथा लेखनाला नवे परिमाण देणाऱ्या त्यांच्या योगदानाचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात येणार आहे.
राणी मुखर्जीला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार
राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेत्री राणी मुखर्जी यांची निवड करण्यात आली आहे. गेली दोन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ब्लॅक, हम तुम, वीर-झारा, मर्दानी, नो वन किल्ड जेसिका यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या प्रभावी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विविधांगी भूमिका साकारत त्यांनी व्यावसायिक आणि आशयघन अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या अभिनयाला राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक प्रतिष्ठेचे सन्मान मिळाले आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कारांची घोषणा..
महाराष्ट्र शासनाचे व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार हे चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मानाचे पुरस्कार मानले जातात. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, पटकथा लेखन, निर्मिती आणि तांत्रिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांचा या पुरस्कारांद्वारे गौरव केला जातो. या पुरस्कारांमुळे केवळ कलाकारांच्या कार्याचा सन्मान होत नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध परंपरेलाही अभिवादन केले जाते. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या चारही मान्यवरांनी आपल्या कार्यातून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला वेगळी उंची मिळवून दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या घोषणेचे चित्रपटसृष्टीत आणि रसिकांमध्ये स्वागत करण्यात येत असून, पुरस्कार वितरण सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App