विशेष प्रतिनिधी
पालघर : Ganesh Naik मुंबईत ते गुजरात असा बुलेट ट्रेनचा मोठा प्रकल्प येणाऱ्या काळात सुरू होणार आहे. यावरून गुजराती लोक मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करणार आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जावे लागणार अशी टीका विरोधकांनी केली आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी मोठे विधान केले आहे. येत्या काळात बुलेट ट्रेन सारखा मोठा प्रकल्प सुरू होणार असून यातून गुजरातमधील लोकांनी महाराष्ट्रात येऊ नये तर महाराष्ट्रातील लोकांनी देखील गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावे, असे नाईक यांनी म्हटले आहे.Ganesh Naik
पालघर जिल्ह्यातील शिरगाव समुद्रकिनाऱ्यावर आयोजित ग्लोबल कोकण महितसव 2026 आणि कोकण सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. 18 ते 22 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळेल, असा विश्वास यावेळी गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे.Ganesh Naik
गणेश नाईक यावेळी बोलताना म्हणाले, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेऊन गुजरातमधील लोक महाराष्ट्रात तर येतीलच पण महाराष्ट्रातील लोकांनी देखील गुजरातमध्ये व्यवसाय सुरू केले पाहिजेत. गुजराती लोकांनीच इथे व्यवसाय सुरू केले पाहिजे असा काही सिद्धांत नाही, असे विधान नाईक यांनी केले. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील दळणवळण अधिक वेगवान होणार आहे. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी असे विधान केले आहे. तसेच चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांना रोजगाराची मोठी संधी मिळेल, असा विश्वास देखील यावेळी नाईक यांनी व्यक्त केला आहे.
प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात बीच फेस्टिवल
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव कोकणातील निसर्गसंपदा, पर्यटन, लोककला आणि ग्रामीण उद्योगांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तर कोकणापासून ते थेट तळकोकणापर्यंत पसरलेल्या या अथांग किनारपट्टीवर प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून, याद्वारे कोकणच्या सांस्कृतिक आणि औद्योगिक वैभवाचे दर्शन घडवण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
400 हून अधिक स्थानिक उद्योजकांचे स्टॉल्स
या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांची मेजवानी असणार आहे. यात 400 हून अधिक स्थानिक उद्योजकांचे स्टॉल्स आणि 100 पेक्षा जास्त महिला बचत गटांचे विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार असून, कोकणी खाद्यसंस्कृतीचा अस्सल आस्वाद देणारा फूड फेस्टिवल हे मुख्य आकर्षण ठरेल. यासोबतच मराठी चित्रपट महोत्सव आणि 150 कलाकारांचा सहभाग असलेले ‘राजा रयतेचा’ हे भव्य महानाट्य या महोत्सवाची रंगत अधिकच वाढवणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App